महासमुंद – कॉंग्रेसचे दक्षिण गोव्यातील उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस (Captain Viriato Fernandes) यांच्या विधानावरून छत्तीसगढच्या ( Chhattisgarh) महासमुंद येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कॉंग्रेसवर (Congress) प्रखर टीका केली. ही कॉंग्रेसने समजून उमजून खेळलेली खेळी असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. अगोदर कॉंग्रेसच्या कर्नाटकातील एका खासदाराने म्हटले की आम्ही दक्षिण भारताला एक वेगळा देश घोषित करू.
आता कॉंग्रेसचे गोव्यातील उमेदवार म्हणतात की गोव्यात भारताचे संविधान लागू होत नाही. ते सरळ सरळ म्हणत आहेत की गोव्यावर संविधान लादण्यात आले आहे. राहुल गांधी यांनाही आपण हे सांगितले होते असेही ते म्हणत आहेत. तसे जर असेल तर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान नाही का? हा भारताच्या राज्यघटनेचा अपमान नाही का? ही देशाच्या घटनेबाबत छेडछाड नाही आहे का? असे सवाल मोदी यांनी विचारले.
अगोदर जम्मू काश्मीरचे लोकही असेच म्हणायचे. मात्र तुम्ही मोदींना आशीर्वाद दिला आणि त्यांचे तोंड बंद झाले. आज तेथे संविधान लागू आहे. बाबासाहेबांचे जे संविधान तेथे चालत नव्हते तेही आज तेथे लागू करण्यात आले असल्याचे मोदींनी म्हटले.
कॉंग्रेसचे उमेदवार म्हणतात की आम्ही ही माहिती राहुल गांधी यांना दिली होती. आता ही बाब जाहीर करणे म्हणजे त्यांच्या नेत्याने त्यांना दिलेली मूक संमती आहे. ही देश तोडण्याची समजून उमजून केलेली खेळी आहे. देशातील एका मोठ्या भागाने कॉंग्रेसला नाकारले असल्यामुळे ते आता असे छोटे टापू बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज ते गोव्यात संविधान नाकारत आहेत. उद्या संपूर्ण देशात बाबासाहेबांचे संविधान नाकारण्याचे पाप करतील, असा आरोप मोदींनी केला.