बागलाण तालुक्यातील खते व बियाणे पुरवठ्याची माहिती घेत पिकांची केली पहाणी
मालेगाव :- ‘मा. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजने’द्वारे शेतकऱ्यांना सबसिडी देवून त्यांना पाठबळ दिले जाणार आहे. त्यामुळे फार्मर प्रोड्युसर कंपनीने बागलाण तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सोबत घेवून काम करावे. प्रोड्युसर कंपनी, गटशेती अशा पद्धतीने काम करणारे शेतकरी व त्यांच्या कंपन्यांच्या मागे शासन खंबीरपणे उभे असून शेतकरी बांधवांना चिंतामुक्त व समृध्द करण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे मत, राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.
बागलाण येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी श्री. भुसे यांनी बागलाण तालुक्यातील खते व बियाणे पुरवठ्याची माहिती घेत पिकांची पाहणी केली. तसेच सीताफळ लागवड, शेतीशाळेचे उद्घाटन व इमोमेक्टीन वाटपाचा कार्यक्रमही संपन्न झाला. यावेळी आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार जितेंद्र इंगळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ व प्रशिक्षण वर्गातील शेतकरी उपस्थित होते.
भुसे म्हणाले, शेतकऱ्यांनी पिकविलेला माल, प्रक्रिया केलेला माल तसेच हा माल ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचे काम फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून उभे केले जाणार आहे. ‘मा.बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजने’द्वारे शेतकऱ्यांना सबसिडी देण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एकत्र यावे, गटशेती करावी तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यतातून विकासाकडे वाटचाल करावी, असे आवाहनही मंत्री भुसे यांनी केले.
नाशिक जिल्हा बँकेला सुमारे ८७० कोटींचा निधी कर्जमुक्ती योजनेच्या अनुषंगाने वर्ग करण्यात आलेला आहे व याच निधीतून शेतकऱ्यांना पीककर्जाचा पुरवठा करण्याचे निर्देशही जिल्हा बँकांना देण्यात आल्याने ‘महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेला’ आता गती मिळेल. तसेच मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग सक्षम असून, तशा उपाययोजना राबविण्यासाठी कृषी विभागाला सूचना देण्यात आल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.
अर्लीद्राक्षाच्या संदर्भातील प्रश्नांवर येत्या आठवड्याभरात जाणकार व निर्यातदारांसोबत बैठक घेवून प्रश्न निकाली काढण्यात येणार आहे. तसेच केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पीक विमा संदर्भातील विमा ऐच्छिक करण्यात आला आहे. तशी मुभा शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे. कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ आता शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाईन घेता येणार आहे, यासाठी एकच नमुन्यातील अर्ज राहणार असून या ऑनलाईन प्रक्रियेमुळे सर्व योजनांमध्ये पारदर्शीपणा येणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
खतांचा तुटवडा जाणवणार नाही
महाराष्ट्रात आत्तापर्यंत साधारणत: ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ज्या शेतकरी बांधवांचे सोयाबिन बियाण्यांच्या माध्यमातून नुकसान झाले त्यांना कसा लाभ देता येईल, त्यासाठी शासन विचार करीत आहे. बागलाण तालुक्यात खते मिळत नसल्याबाबतचे कळताच कृषी विभागाला सांगून खते उपलब्ध करून देण्यात आली. सालाबादाच्या मागणीप्रमाणे रासायनिक खते, युरिया आणि इतर खतांची उपलब्धता केली आहे, मात्र कोरोनामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली तर खतांचा पुरवठा थोडा उशिरा होण्याची शक्यता आहे. परंतू प्रत्येक शेतकऱ्याला खतांची उपलब्धता होईल यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून ५० हजार मेट्रीक टनाचा बफर स्टॉक कृषी विभागाकडे ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गरजेपेक्षा अधिक खतांचा साठा करू नये. तसेच बोगस बियाणांच्या तक्रार निवारणासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. प्राप्त तक्रारींचा कृषी विभागामार्फत तात्काळ न्यायनिवाडा करण्यात येणार असल्याचे श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.
मेंढपाळांना कृषिमंत्र्यांकडून दिलासा
बागलाण तालुक्यातील अंबासन फाट्यावरील मेंढपाळांच्या रहाटीला भेट देवून त्यांच्या समस्या कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी जाणून घेतल्या. भेटी प्रसंगी मेंढपाळांच्या जित्राबावर ओढावलेल्या लंगड्या रोगाची समस्या दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश भुसे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
कऱ्हे येथील शेततळे व अस्तरीकरण पाहणी
‘मागेल त्याला शेततळे’ व राष्ट्रीय कृषी विकास योजना २०१९-२०२० अंतर्गत कऱ्हे, ता.सटाणा येथील अनिता मांडवडे या लाभार्थ्याच्या शेततळे व अस्तरीकरण याची पाहणी श्री.भुसे यांनी केली. या योजनेतून सौ.अनिता मांडवडे यांना शेततळे खोदकामासाठी ५० हजार व शेततळ्याचे प्लास्टीक अस्तरीकरणासाठी ७५ हजार इतके अनुदान कृषी विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आले. पाणी उपलब्धतेमुळे आता कमी खर्चात अधिक उत्पादन त्या आपल्या शेतीक्षेत्रात घेत आहेत. कोरोनाच्या काळातही कृषी मंत्री यांनी शेताच्या बांधावर भेट देवून मार्गदर्शन केले असल्याने मांडवडे कुंटुबियांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव तरळत होते.
ओम हायटेक नर्सरीच्या उपक्रमाचे कौतुक
टेंभे ता.सटाणा येथील पॅक हाऊस व ओम हायटेक नर्सरी येथील युवकांनी अतिशय शास्त्रीय पध्दतीने रोपांची निर्मिती केली आहे. भविष्यात ही रोपे शेतकऱ्यांना नक्कीच चांगली उत्पादन देवून शकेल असा विश्वास, कृषीमंत्री भुसे यांनी व्यक्त केला. या पॅक हाऊस अंतर्गत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रोपे तयार केली जातात. बियाणे सुध्दा शेतकरीच पुरवतात. शेतकऱ्यांच्या नावानुसार व टॅग लावून रोपांची विभागणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच या युवाशक्तीच्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
स्व .भाऊसाहेब फूंडकर फळबाग लागवड योजना सन २०१९-२० अंतर्गत लाभ घेतलेले जगदिश भावराव सावंत यांच्या १.२० हेक्टर क्षेत्रात गोल्डन सुपर या वाणाच्या सिताफळ फळबागेची पाहणी करुन श्री. भुसे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत भरडधान्य विकास कार्यक्रम यात मका पीक लाभार्थी भुषण शांताराम कोर शेतात जावून वाणाच्या लागवडीच्या प्रात्यक्षिकाची पाहणी केली.
कृषी मंत्र्यांनी देवळा येथील बैठकीत खते व बियाणांच्या पुरवठ्याबाबत घेतला आढावा
देवळा तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालविणाऱ्या दुकानदाराने त्यांच्याकडील उपलब्ध साठा व दर पत्रकाचा फलक दुकानाच्या दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. ज्या दुकानात असा फलक लावलेला नसेल, त्याचा फोटो काढून पाठवा, अशा क्षेत्रातील अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी देवळा येथील आढावा बैठकित सांगितले. तसेच देवळा तालुक्यातील खते व बियाण्यांचा लक्षांक पूर्ण करण्यात आला आहे. महिला शेती शाळेमुळे चूल व मूल या संकल्पनेतून महिला बाहेर पडताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महिला शेतकऱ्यांच्या प्रशिक्षण वर्गाची धुरा सांभाळणाऱ्या महिला कृषी सहाय्यकांसह महिला शेतकऱ्यांचा सन्मानही यावेळी कृषी मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.