पुणे – बाजार आवारातील शेतीमाल नियमनमुक्त करा तसेच देखरेख शुल्क रद्द करण्याच्या मागणीसाठी मार्केटयार्डातील भुसार, गूळ बाजारातील व्यापाऱ्यांनी 25 ऑगस्टला लाक्षणिक बंद पुकारला आहे. व्यापाऱ्यांच्या बंदला श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे. 25 ऑगस्ट रोजी मार्केटयार्डातील मुख्य भाजीपाला बाजार, फळे, कांदा-बटाटा विभाग, केळी, पान बाजाराचे कामकाज नियमित सुरू ठेवण्यात येणार आहे.
बाजार आवाराबाहेरील शेतीमाल विक्री व्यवहारांवर नियमन राहणार नाही. बाजार आवारातील शेतीमालावर नियमन राहणार असून बाजारातील व्यापाऱ्यांकडून कर (सेस) तसेच देखरेख शुल्क आकरण्यात येणार आहे. हा निर्णय मागे घेण्यासाठी राज्यातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी (25 ऑगस्ट) लाक्षणिक बंद पुकारला आहे तसेच उद्या (21 ऑगस्ट) महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाने बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.
मार्केटयार्डातील अडते संघटनेने बंदला पाठिंबा दर्शविला असला तरी भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा विभाग, केळी, पान बाजराचे कामकाज नियमित सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.
करोनाचा संसर्गामुळे बाजार आवारातील कामकाज विस्कळीत झाले आहे.
भाजीपाला नाशवंत आहे. एकदिवस जरी बाजार बंद ठेवला तरी नुकसान होते. व्यापारी वर्गाकडून शेतीमाल नियमन मुक्तीबाबत यापुढील काळात करण्यात येणारे आंदोलनास तसेच भूमिकेस अडते संघटनेचा पाठिंबा राहिल, असे भुजबळ यांनी सांगितले.
भुसार बाजार आज सुरू राहणार
बाजार समिती वगळता कृषी उत्पन्न नियममुक्त करण्याच्या निर्णयाच्या विरोधात कृषी उत्पन्न संघाने शुक्रवार (दि.21) रोजी लाक्षणिक बंद पुकारला आहे. भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या दि पुना मर्चंट्स चेंबरने याला पाठींबा दर्शविला आहे. तरी भुसार बाजार नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली.