मुंबई : राज्यातील पहिल्या कोरोनाबाधितांविषयी दिलासादायक बातमी आली असतानाच आता आणखी एक चिंताजनक वृत्त समोर आले आहे. राज्यात कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात एका ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा कोरोना विषाणूमुळे सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला.
मृत व्यक्ती काही दिवसांपूर्वीच अहमदाबादहून परत आला होता. या व्यक्तीने परदेश प्रवास केला होता असेही सांगण्यात येते. कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्याने या व्यक्तीला २३ मार्च रोजी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना विषाणू चाचणीत या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरु असतानाच त्याचा सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला.
या व्यक्तीला मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच श्वसनास त्रास होत होता, असे सांगण्यात येते. राज्यातील कोरोनाविषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू होणारा चौथा बळी ठरला आहे.