पुणे – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुण्यात “लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची उपस्थिती होती. तसेच, राज्यपाल राजेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, डॉ. दीपक टिळक देखील मंचावर उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी मोदींविषयी बोलताना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी पंतप्रधान मोदी यांची निवड झाली, यासाठी मी त्यांचं अंत:करणापासून अभिनंदन करतो..’ अशा शब्दात शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, आपल्या भावना देखील व्यक्त केल्या..
कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, “टिळक पुरस्काराला आगळं वेगळं महत्त्व आहे. आज आपण आणि टिळक स्मारकाने पुरस्कारासाठी मोदीजींची निवड केली. या पुरस्कारांमध्ये इंदिरा गांधी, खान अब्दुल गफार खान, बाळासाहेब देवरस, शंकर दयाळ शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह होते अशी अनेक मान्यवरांची नावं या ठिकाणी घेतली जातील. या मान्यवरांच्या पंक्तीत नरेंद्र मोदींचा समावेश झाला याचा सर्वांना आनंद झालं. म्हणून आमच्या सगळ्यांची वतीने त्यांची निवड झाली, त्यांना हा पुरस्कार देण्यात येतोय, त्यांचं अंत:करणापासून अभिनंदन करतो.
यावेळी सुरवातीलाच शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव शाली इतिहासाची ओळख करून दिली. शरद पवार म्हणाले, या देशात पुणे शहराला अनोखे महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्व जगाला माहित आहे. शिवाजी महाराजांचा जन्म या जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. पुणे शहरातील लाल महालात त्यांचं बालपण गेलं. या देशात अनेक राज राजवाडे होऊन गेले. त्यांच्या नावाने त्यांची संस्थाने ओळखली जात.
मोगलचे दिल्लीचे संस्थान असेल किंवा देवगिरीच्या यादवांचे संस्थाने असतील. अनेकांची संस्थाने या देशात होऊन गेली. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे दुसऱ्याचे राज्य नव्हते, तर स्वतःच्या बळावर उभारलेले राज्य होते. ते रयतेचे हिंदवी स्वराज्य होते. अलीकडच्या काळात देशाच्या रक्षणासाठी एक प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलेला होता. सर्जिकल स्ट्राईकची चर्चा आता होते. मात्र जेव्हा लाल महालामध्ये शायिस्तेखानाने ताबा घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी शिवाजी महाराजांनी तो प्रयत्न हाणून पाडला. तो देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक होता, अशा शब्दांत शरद पवार यांनी शिवाजी महाराज यांचा गौरव केला.