नवी दिल्ली : वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज होणार आहे. ज्याचा भारतात परिणाम होणार नाही. म्हणजेच आपल्या देशात आपण ते पाहू शकणार नाही. हे सूर्यग्रहण आंशिक असेल, त्यामुळे सुतक कालावधी नसेल असे सांगण्यात येत आहे. ज्योतिषशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारताच्या वेळेनुसार, सूर्यग्रहण शनिवारी 30 एप्रिलच्या अमावस्येच्या रात्री 12:16 पासून सुरू होईल आणि 1 मे रोजी पहाटे 4:8 पर्यंत राहील. हे ग्रहण दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना, बोलिव्हिया, चिली, नेरू, उरुग्वे, पॅराग्वे, उत्तर अंटार्क्टिका, दक्षिण पॅसिफिक समुद्र आणि दक्षिण अटलांटिक समुद्र इत्यादी ठिकाणी पाहता येईल.
सूर्यग्रहण रात्री असल्याने ते भारतात दिसणार नाही. तसेच येथे कोणत्याही प्रकारच्या सुतक वगैरेचा परिणाम होणार नाही. भारताच्या वेळेनुसार, मध्यरात्री 12.15 पासून सुरू होईल आणि पहाटे 4.07 पर्यंत राहील. सूर्यग्रहण अर्धवट असल्याने केवळ 64 टक्के सूर्य चंद्राच्या सावलीने झाकलेला असणार आहे.
जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो, तेव्हा पृथ्वीवर सावली पडते आणि या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. परंतु जेव्हा चंद्र अर्धवट सूर्यप्रकाश झाकतो, म्हणजेच जेव्हा सूर्य चंद्रकोराच्या रूपात दिसतो, तेव्हा आंशिक सूर्यग्रहण होते. जेव्हा चंद्र त्याच्या सावलीचा फक्त बाह्य भाग सूर्यावर टाकतो तेव्हा त्याला उपछाया म्हणतात.