मुंबई : देशात कोरोनाने हातपाय पसरले आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 400 पार पोहोचली आहे. अशा जीवघेण्या आजाराशी लढण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक प्रयत्न करत असून यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत. अशातच आता कोरोनाशी दोन हात करण्यासाठी उद्योजकही पुढे सरसावले आहेत.
वाढत्या करोनाबाधित रुग्णांची संख्या तासागणिक वाढत असताना रिलायन्स इंडस्ट्रीजने मुंबईत विशेष रुग्णालय सुरू केले आहे. अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र १०० खाटांची सुविधा करण्यात आली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, अवघ्या दोन आठवडय़ांत याबाबतची सुसज्जता समूहाने केली आहे. समूहाच्या रिलायन्स फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेद्वारे रिलायन्स इंडस्ट्रीजला हे शक्य झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, भारतामध्ये एकीकडे 37 कोरोनाचे रुग्ण बरे होऊन आज घरी जाणार आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. आज कोरोनाचे आणखी 4 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. पुण्यात 3 तर साताऱ्यामध्ये कोरोनाचा 1 असे चार नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 101 झाली आहे.