सावित्रीबाई फुले भाजी मंडईत दोन टन क्षमतेचा प्रकल्प सुरू
नगर – बुरुडगावचा बंद असलेला कचरा डेपो व सावेडीच्या कचरा डेपोस होत असलेला विरोध या पार्श्वभूमीवर आता प्रभागांतून खतनिर्मितीचे प्रकल्प करण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे. असा पहिला प्रकल्प सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकातील सावित्रीबाई फुले भाजी मंडईत उभारण्यात आला आहे. दोन टन क्षमतेच्या या प्रकल्पाची प्राथमिक चाचणी आनखी दोन दिवस चालणार असून नंतर आयुक्तांच्या आदेशाने पुढील कारवाई केली जाणार आहे.
कुजणाऱ्या कचऱ्यातून खत व स्वयंपाकासाठी वापरता येऊ शकणारा बायोमिथेन गॅस येथे निर्माण होणार आहे. पहिल्या टप्प्यात आणखी दोन ठिकाणी असे प्रकल्प होणार असून, त्यानंतर राहिलेल्या 14 प्रभागांतही त्यांचे नियोजन आहे. बुरुडगाव कचरा डेपोत 50 टनी तर सावेडी डेपोत 100 टन क्षमतेचे कचऱ्यातून खत निर्माण करण्याचे मनपाचे प्रकल्प आहेत. पण यापैकी बुरुडगावचा प्रकल्प नवीन ठेकेदार नेमला नसल्याने बंद आहे. फक्त सावेडी प्रकल्पातच खतनिर्मिती होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित लवादाने खत प्रकल्पाचे विकेंद्रीकरण करण्याचे व कमी क्षमतेचे प्रकल्प करण्याचे मनपाला सुचवले होते. त्यानुसार प्रत्येकी दोन टन क्षमतेचे तीन प्रकल्प मनपाने प्रस्तावित केले आहेत.
प्रत्येकी 30 लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पांपैकी पहिला प्रकल्प सावेडीतील प्रभाग कार्यालयामागे असलेल्या सावित्रीबाई फुले भाजी मार्केटमध्ये बंदिस्त स्वरुपात उभारण्यात आला असून, आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग व प्रकल्प अभियंता राजेंद्र मेहेत्रे यांच्या उपस्थितीत त्याची प्राथमिक चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी झाल्याने अशाच पद्धतीने आणखी दोन ठिकाणी असे प्रकल्प केले जाणार आहेत. त्यामध्ये आनखी दोन दिवस ती चाचणी केली जाणार असून आयुक्त भालसिंग यांच्या सुचनेने पुढील कारवाई केली जाणार आहे. सावेडीत उभारण्यात आलेल्या पहिल्या छोट्या खतनिर्मिती प्रकल्पात शहरातील हॉटेलमधील शिळे खाद्यपदार्थ व भाजी मंडईतील टाकाऊ भाजीपाला वापरला जाणार आहे.