मुंबई – गेल्या चार कामकाजाच्या दिवसांत शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य आठ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. बुधवारीही शेअर बाजार निर्देशाकांत दोन टक्क्यांची घट झाली.
गेल्या चार सत्रात सेन्सेक्स 4.78 टक्क्यांनी म्हणजे 2,382 अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे मुंबई शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य 8,07,025 कोटी रुपयांनी कमी होऊन 1,89,63,547 कोटी रुपये झाले आहे.
अगोदरच शेअर बाजाराचे निर्देशांक आवश्यकतेपेक्षा जास्त पातळीवर आहेत असे बोलले जाते. त्यातच पुढील आठवड्यात अर्थसंकल्प सादर होणार आहे. या कारणामुळे गुंतवणुकदार नफा काढून घेत असल्याचे वातावरणाचे आहे, असे रेलिगेअर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले.
कंपन्यांचे ताळेबंद चांगले जाहीर होत आहेत. त्याचबरोबर भारताचा विकास दरही वाढण्याची शक्यता आहे. जर दरम्यानच्या काळामध्ये चांगला अर्थसंकल्प जाहीर झाला तर शेअर बाजार निर्देशांकाच्या पडझडीला लगाम बसेल असे सांगण्यात आले.