अशोकबापू आणि मी काही वर्गमित्र नाही, माझ्या माहितीनुसार मी ज्या वेळेस शिरूरच्या चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय येथे 11वी कॉमर्सला प्रवेश घेतला. त्यावेळी अशोकबापू हे बीएस्सी ऍग्री करून पुन्हा कॉमर्स साइड घेऊन प्रथम वर्षात शिकत होते. हे सांगण्याचा उद्देश एवढाच की बऱ्याच लोकांना वाटते की, मी अशोकबापू ह्यांचा वर्गमित्र आहे, बरे असो.
माझी आणि अशोकबापू यांची कॉलेज जीवनापासून जी मैत्री झाली ती आजतागायत कायम आहे. अशोकबापू यांना महाविद्यालयीन जीवनापासूनच सामाजिक आणि राजकीय गोष्टीत रस होता, अशोकबापू यांना राजकारणाचे बाळकडू त्यांचे वडील आदर्श माजी आमदार स्व. रावसाहेबदादा पवार यांच्या शिरूर तालुक्याच्या विकासात्मक दृष्टिकोनातून मिळाले.
अशोकबापू यांनी महाविद्यालयात शिकत असताना यूआरची निवडणूक जिंकून पुणे विद्यापीठात शिरूरच्या महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केलेले होते. माझ्या मते, अशोकबापू यांची खरी राजकीय कारकीर्द सुरू झाली ती म्हणजे घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर त्यांची चेअरमन म्हणून निवड झाली आणि अशोकबापू यांनी कारखाना अतिशय चांगला चालवून राज्यपातळीवरील अनेक पुरस्कार कारखान्याला मिळवून दिले. तेव्हापासून आजपर्यंत अशोकबापू यांनी रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना अतिशय कार्यक्षमतेने यशस्वीपणे चालवलेला आहे.
दरम्यानचे काळात अशोकबापू पवार यांच्या विकासाभिमुख आणि जनतेच्या प्रश्नावर काम करण्याच्या पद्धतीवर आपल्या देशाचे नेते आणि तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार साहेबांचे लक्ष गेले आणि अशोकबापू यांना 2009च्या विधानसभेचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तिकीट मिळाले. या शिष्टमंडळात घोडनदी बार असोसिएशनचे 50 वकील गेले होते, त्यात मी उपाध्यक्ष म्हणून हजर होतो.
अशोकबापू यांनी 2009ला आमदार झाल्यानंतर शिरूर-हवेली मतदारसंघात सगळीकडे विकासकामे करण्याचा धडाका लावला होता. त्यामुळे अशोकबापू यांचेवर सर्वसामान्य जनतेचे प्रेम वाढू लागले. विकासकामे करत असताना कोणत्या गावात मला मते कमी पडली, त्यामुळे तेथे विकासकामे करणार नाही अशा स्वरूपाची भूमिका कधी घेतली नाही. शिरूर शहरात अतिशय कमी मतदान होऊनदेखील शिरूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी शिरूर नगरपालिका सभागृह नेते प्रकाशशेठ धारिवाल यांचेही त्यांना विशेष सहकार्य असते.
2009 ते 2014 च्या पहिल्या आमदारकीच्या काळात अशोकबापूंनी शिरूर शहरात उभारलेली प्रचंड अशी प्रशासकीय इमारत, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत, पंचायत समिती कॉम्प्लेक्स, तसेच जिजामाता गार्डन शेजारी उभी केलेली व्यायामशाळा आणि शिरूर शहरातून जाणारा रस्ता अशी सुमारे 50 कोटी रुपयांची कामे पूर्ण केलीफ अशातच 2019 साल उजाडले विधानसभेची निवडणूक लागली आणि पक्षाने पुन्हा एकदा अशोकबापू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आदरणीय पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सुप्रियाताई यांनी अशोकबापू यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली. शिरूर-हवेलीतील जनतेच्या पाठबळावर तसेच 2009 ते 2014च्या कालावधीत केलेल्या विकासकामांच्या जोरावर 41,500 मतांच्या फरकाने विजयी झाले. या विजयात अशोकबापूंना शिरूर-हवेलीतील जनतेने भरभरून मताचे दान दिले आणि 2014ची झालेली चूक भरून काढत न भूतो न भविष्यति असा दणदणीत विजय मिळवून दिला.
2019 च्या विधानसभेत पुन्हा निवडून आल्यानंतर अशोकबापूंनी 2014पासून प्रलंबित असलेली कामे पुन्हा एकदा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात प्रामुख्याने शिरूर कोर्टाच्या इमारतीच्या कामासाठी पहिल्याच अर्थसंकल्पात 33 कोटी 80 लाख रुपये मंजूर करून घेतले. शिरूरच्या वकिलांचे त्यांचेवर असलेले प्रेम कसे योग्य आहे ते दाखवून दिले. तसेच 2014 ला अपूर्ण राहिलेले टपरी पुनर्वसनच्या शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी देखील 5 कोटी रुपये मंजूर केले. शिरूर शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यासाठीसुद्धा 5 कोटी रुपये मंजूर केले. सामाजिकदृष्ट्या अल्पसंख्याक असणारौया गोसावी समाजाच्या स्मशानभूमीच्या भिंतीच्या कामासाठी निधी मंजूर केला आहे.
शिरूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे अशोकबापू यांचे स्वप्न असून त्यात एक मोठे क्रीडासंकुल करण्याचे नियोजन आहे. शिरूर बस स्थानकाचे कामदेखील ह्या कार्यकाळात पूर्ण करण्याचा निश्चय बापूंनी केला आहे. मतदारसंघातील सर्वात महत्त्वाचा असणारा पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावणेसाठी सरकार दप्तरी पाठपुरावा करून प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरून काम करून घेत आहेत. अशा ह्या आमच्या लाडक्या आमदार मित्राला लवकरात लवकर कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळात होवो, अशा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
शब्दांकन : मुकुंद ढोबळे, शिरूर तालुका प्रतिनिधी