ओतूर -नगर-कल्याण महामार्गालगत ओतूर (ता. जुन्नर) हद्दीत पत्रा शेडमध्ये असलेली चार दुकाने आगीत खाक झाली आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. 28) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी चारही दुकानांचे मिळून अंदाजे 20 लाखांचे नुकसान झाले आहे.
या आगीत व्यावसायिक गणेश चांगदेव थोरात यांचे जय मल्हार फिब्रिकेशनमधील सुमारे तीन लाखांचे इलक्ट्रिक औजारे व सर्व मशीन, विक्रम रंजन खरात यांचे गणराज ऑटो मोबाइल अँड गॅरेजमधील इंजिन, टायर, बॅटरी आणि स्पेअर पार्ट तसेच गॅरेज मध्ये लावलेली दुचाकी असे चार ते पाच लाखांचे, माउली हुंडेकरी अँड ट्रान्सपोर्ट या गाळ्यामधील बारदान, कांदा बियाणे, कपाटे, लाकडी फर्निचर, केबिन व आतमध्ये लावलेल्या दोन दुचाकी असे चार ते पाच लाखांचे तर जय मल्हार ऑटो मोबाइल स्पेअर पार्टचे आगीत भस्मसात होवून दहा लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
आग लागल्याचे समजताच ओतूरचे सरपंच संतोष तांबे, ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. तर लागलीच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा आग आटोक्यात आणण्यात यश आले. घटनास्थळी जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी हेमंत गरीबे, ओतूरचे मंडलअधिकारी लवांडे, तलाठी पलांडे यांनी भेट दिली.
महसूल विभागाच्या वतीने पंचनामा देखील करण्यात आला आहे.संबंधित व्यावसायिक संपुर्णतः याच व्यावसायावर अवलंबुन आहेत. त्यामुळे शासनानाने तातडीने मदत करावी अशी मागणी व्यावसायिकांमधून जोर धरीत आहे.
रात्री उशिरा आग आटोक्यात
ही आग इतकी भयंकर होती की महामार्गावर आगीच्या झळा लागत होत्या, यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरत होते. जणू या ठिकाणी अग्नीचा तांडव सुरू होता. स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र आगीची दाहकता एवढी भयानक होती की आग विझवणे कठीण जात होते. अखेर अग्निशामक दलाच्या जवानांची शर्थीचे प्रयत्न करून रात्री उशीरा आग आटोक्यात आणली.