नगर – पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आ. राम शिंदे यांच्यात वाद असल्याची कबुली देतानाच हे पेल्यातील वाद आहेत आणि वाद असले तरी वादळ नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्या एका बाजूला आ. राम शिंदे व दुसऱ्या बाजूला मंत्री राधाकृष्ण विखे बसले होते.
या दोघांमध्ये सुरू असलेल्या वादाबाबत फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले की, म्हणूनच मी दोघांच्या मध्ये बसलोय. दोघांमध्येही समन्वय झाला आहे. वाद असला तरी वादळ नक्कीच नाही, तो पेल्यातील वाद असून, तोही आता संपलेला आहे. नगर जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा व यात एका भाजप आमदाराचा सहभाग असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, जलजीवन मिशन योजनेच्या सर्व कामांसाठी केंद्र सरकारने निधी दिला असला, तरी या सर्व कामांच्या निविदा महाविकास आघाडी सरकारच्या काळात निघाल्या. यात काही तक्रारी आहेत, त्याची चौकशी केली जाईल. याबाबत अधिक माहिती घेऊ, असेही ते म्हणाले. अतिवृष्टीने जिल्ह्यात 298 कोटी रुपयांचे 2 लाख 98 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामध्ये 161 कोटी रुपयांचे वितरीत झाले आहे. उर्वरित निधी वितरणास गती देण्याची सूचना दिल्याचे ते म्हणाले.
माझ्यावर जबाबदारी – विखे
मंत्री विखे यांनीही मेळाव्यात बोलताना आ. शिंदे यांच्या वक्तव्याचा धागा पकडत, पक्षाच्या शिस्तीबाहेर आम्ही कुणीच नाही, आपण एकाच घरात आहोत. रामभाऊ आजही जबाबदारी माझ्यावरच आहे आणि उद्याही माझ्यावरच असणार आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, असे सूचक विधान मंत्री विखे यांनी केले. फडणवीस यांचे मार्गदर्शन आहे. जी जबाबदारी दिली जाईल, जे आदेश देतील ते शिरसावंद्य मानून काम करू, असेही विखे यांनी स्पष्ट केले.
युतीमध्ये वाद नाही
शिवसेना व भाजपमध्ये कोणतेही वाद नाहीत. आम्ही समन्वयातून काम करत आहोत. जेव्हा जागावाटप ठरेल, तेव्हा सांगितले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. एनडीएमध्ये आम्हाला सापत्न वागणूक मिळतेय, असे गजानन कीर्तीकर कुठेही म्हटलेले नाहीत. या कपोकल्पित बातम्या आहेत, असे स्पष्टीकरणही फडणवीस यांनी दिले.
कोण संजय राऊत?
मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर सरकार पडेल, त्यामुळे विस्तार होत नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली. त्याला उत्तर देताना नाना पटोले व संजय राऊत हे बोलघेवडे लोकं आहेत, तुम्हाला काम पाहिजे म्हणून ते बोलतात. आम्हाला खूप कामे आहेत. आम्ही त्यांना उत्तर देत नाहीत, असे म्हणत मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असे फडणवीस म्हणाले. संजय राऊत यांच्या आरोपाबाबत विचारताच कोण संजय राऊत? असा प्रतिसवाल करत त्यांनी राऊत यांची खिल्ली उडविली.
..असे म्हणू नका
महाविकास आघाडीत सुरू असलेला छोटा भाऊ, मोठा भाऊ वाद भाजपनेच लावल्याची टीका झाली होती. त्यालाही फडणवीस यांनी उत्तर दिले. महाविकास आघाडीत काही झाले, तरी ते आम्हीच केले असा त्यांचा आरोप असतो. एखाद्याच्या घरी मुलगा झाला, तरी त्यात आमचा हात आहे, असे तरी म्हणू नका, असा टोलाही त्यांनी लगावला.
पेल्यातील वाद पेल्यातच राहावा – आ. शिंदे
दरम्यान, पत्रकार परिषदेनंतर भाजप मेळाव्यात बोलताना आ. राम शिंदे यांनी पुन्हा पेल्यातील वादाचा मुद्दा छेडला. वाद संपले, असे आपण पत्रकार परिषदेत सांगितले असले, तरी पेल्यातील वाद पेल्यातच राहिला पाहिजे. तुमच्यासमोर जास्त बोलायची हिंमत आम्ही करू शकत नाही. मात्र, आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या जे मनात आहे, त्यावर बोलावे, अशी विनंती फडणवीस यांना केली.