वाघळवाडी (वार्ताहर) – बारामती तालुक्यात 99 ग्रामपंचायती आहेत. तर 66 ग्रामसेवक व 24 ग्रामविकास अधिकारी आहेत. फक्त 9 ग्रामसेवकांवर अतिरिक्त गावांचा पदभार आहे. ज्या ग्रामसेवकांना एक गाव आहे तेदेखील त्या ग्रामपंचायतमध्ये नियमित उपस्थित राहत नाहीत. सबब म्हणून नेहमी एकच कारण दिलं जातं तालुक्याच्या कार्यालयात कामानिमित्त आलो आहे. मोबाइल नंबर बंद करून ठेवला जातो. ही स्थिती आहे बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील गावांची. या कारणांनी वाणेवाडी अंतर्गत येणाऱ्या विकासनगर, रामनगर, मळशी, वाघळवाडीतील कन्नडवस्ती, मुरूममधील साळोबावस्ती या गावातील वाड्या वस्त्यांचा विकास खुंटला आहे. येथे पिण्याच्या पाण्याची, दिवाबत्तीची, रस्त्यांची अशा अनेक समस्या आहेत. ग्रामसेवकांच्या दुर्लक्षामुळे गावचा विकरासगाडा काही पुढे जाईना अशी स्थिती या गावांमध्ये आहे.
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्रिस्तरीय पद्धतीची लोकनियुक्त प्रशासकीय यंत्रणा कायद्याने अस्तित्वात आली. गावपातळीवर ग्रामपंचायत ही संस्था अस्तित्वात आली. या संस्थेचे काम नियमानुसार होण्यासाठी विधानसभेत कायदा करण्यात आला. ग्रामपंचायतीचे कामकाज मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार केले जाते. ग्रामीण भागात विकासासाठी ग्रामपंचायतींना प्रोत्साहन दिले जाते. चौदाव्या वित्त आयोगाचा निधीही आता थेट ग्रामपंचायत स्तरावरच दिला जातो. या व्यतिरिक्त स्वनिधी, तसेच केंद्र राज्य सरकारच्या निधीतून ग्रामपंचायतीमार्फत विविध विकासकामे केली जातात.
लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी, त्यात सरपंच, उपसरपंच हे लोकनिर्वाचित पदाधिकारी, तर ग्रामसेवक हे प्रशासकीय पद आहे. ग्रामसेवकावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्यात ग्रामपंचायतीचे दप्तर सांभाळणे, ग्रामसभेचे सचिव, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे, ग्रामपंचायतीची माहिती, तसेच अहवाल पंचायत समिती जिल्हा परिषदेला सादर करणे, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम पाहणे, जन्म-मृत्यूच्या नोंदी यासह विविध महत्त्वपूर्ण कामाची जबाबदारी ग्रामसेवकावर आहे. ग्रामसेवक ग्रामविकास अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्य जबाबदाऱ्या पाडाव्या लागतात.
बारामती तालुक्यात 99 ग्राम पंचायती आहेत. 90 ग्रामपंचायतींना स्वतंत्र ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी असूनसुद्धा अनेक अडचणी येत असून केवळ 9 ग्रामसेवकांवरच 9 गावांचा अधिकचा पदभार आहे. त्यामुळे अनेकवेळा गावात ग्रामसेवक येत नाही. त्यामुळे नागरिक व अधिकाऱ्यांमध्ये वाद होतात. तालुक्यासाठी 99 ग्रामपंचायतींना 90 अधिकाऱ्यांची पदे मंजूर असल्याने फक्त 9 ग्रामसेवकांना दोन-दोन ग्राम पंचायतींचा कामकाज पाहावा लागतो. ज्या ग्रामपंचायती दोन हजार लोकसंख्येच्या आहेत. अशा ग्रामपंचायतीचा भार इतर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावर असेल तर तेथील जनतेची मोठी गैरसोय होते. त्यामुळे आठवड्यातील ठराविक दिवशी संबंधित ग्रामसेवक कार्यालयात हजेरी लावून प्रशासकीय काम आटोपतो. या प्रकारामुळे ग्रामीण जनतेची विविध कामांसाठी गैरसोय होते. ग्रामस्थ या सर्व गोष्टींमुळे हैराण झाले असून त्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या गोष्टींची तक्रार करणार आहेत.
“तालुक्यामध्ये ग्रामसेवक किंवा विस्तार अधिकारी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये उपस्थित नसतील तर ग्रामस्थांनी थेट पंचायत समितीशी संपर्क साधावा. संबंधित ग्रामसेवकांना याबाबत समज देण्यात येईल. “
-प्रमोद काळे, गटविकास अधिकारी बारामती