सुबोध भावे : बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तू विक्री, प्रदर्शनाचे उद्घाटन
विश्रांतवाडी -प्रत्येक माणूस चुका करत असतो; परंतु बंदीजनांनी रागामध्ये केलेल्या चुकीमुळे कायद्याने त्यांना शिक्षा झाली आहे. याचा अर्थ जन्म वाया गेला असे होत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेकजणांनी येथेच शिक्षा भोगली असून बाहेर गेल्यानंतर त्यांनी देशाला स्वातंत्र मिळवून दिले. त्याचप्रमाणे कारागृहात राहून देखील कलेच्या माध्यमातून करत असलेले कार्यच त्यांना जगण्यासाठी ऊर्जा निर्माण करून देईल. कारागृहातील बंदीजनांकडे असलेल्या कलेमुळे त्यांना जगण्याचा आधार मिळाला आहे. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या रूपाने लोकांशी जोडले जाण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असे प्रतिपादन अभिनेता सुबोध भावे यांनी व्यक्त केले.
रक्षाबंधन सणानिमित्त येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे विक्री आणि प्रदर्शनाचे उद्घाटन भावे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, येरवडा कारागृहाचे अधीक्षक यु. टी. पवार, उपअधीक्षक चिंतामणी इंदूरकर, कारखाना व्यवस्थापक सतीश सोनवणे उपस्थित होते. सूत्रसंचालन वरिष्ठ तुरुंगाधिकारी प्रदीप जगताप यांनी केले; तर कारागृह अधीक्षक पवार यांनी आभार मानले.
भावे म्हणाले, सांगली, कोल्हापूरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र धावून आला असून आमच्या टीमने देखील या भागात 7 मदत केंद्र उभारली आहेत. बंदीजनांनी बनविलेल्या संपूर्ण वस्तू या पूरग्रस्तांच्या उपयोगी आहेत. त्यामुळे आपण येथील वस्तू विकत घेऊन पूरग्रस्तांसाठी देणार असल्याचा विचार आहे. कैद्यांनी बनविलेल्या वस्तू पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविल्यास त्यांचे दूःख हलके होण्यास मदत होईल.
बंदीजनांनी बनविलेल्या वस्तू विक्री व प्रदर्शन सोमवारपासून (दि.12) शनिवार (दि.17)पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. तरी परिसरातील नागरिकांनी सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत येऊन आपल्या आवडीच्या व उपयोगी वस्तू खरेदी करत बंदीजनांच्या पुनर्वसनाला सहकार्य करावे.
– यू. टी. पवार, कारागृह अधीक्षक