कोची – करोनाची साथ येऊन गेल्यानंतर देशातून आणि परदेशातून मसाल्याची मागणी वाढली असल्याची माहिती उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयातील संयुक्त सचिव दिवाकर नाथ मिश्रा यांनी दिली.
एवढेच नाही तर, भारतीय मसाल्यामध्ये कोणते औषधी गुण आहेत, या संदर्भात देश-विदेशात मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू झाले आहे. त्या परिस्थितीचा मसाला उत्पादकांनी फायदा करून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मसाले निर्यातदारांच्या परिषदेत बोलताना मिश्रा म्हणाले की, मसाल्याची निर्यात वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे. भारतीय मसाल्याच्या निर्यातीला अनेक शतकांचा इतिहास आहे. आधुनिक काळात परदेशातील जनतेच्या मागण्या लक्षात घेऊन मसाल्याची निर्मिती करण्याची गरज असल्याचे मत या परिषदेत व्यक्त करण्यात आले.
कमीत कमी कीटकनाशके वापरून मसाल्याचे निर्यात केल्यानंतर परदेशांमध्ये अशा मसाल्याची मागणी वाढते. मध्यपूर्वेतील बरेच देश भारतीय मसाल्याची मोठ्या प्रमाणात आयात करतात. त्यातील काही देश तर भारताकडून केलेल्या मसाल्याची आयात पुन्हा त्या देशातून इतर देशाकडे निर्यात करतात असे लक्षात आले आहे. या वर्षी भारताने 207 दशलक्ष डॉलरच्या मसाल्याची निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. सध्याच्या परिस्थितीवरून हे उद्दिष्ट लवकरच साध्य केले जाईल असे दिसून येते.