नवी दिल्ली – शैक्षणिक तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये भारतातील खासगी क्षेत्राने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे भारत आगामी काळात शैक्षणिक तंत्रज्ञान क्षेत्रात जगाची राजधानी होणार असल्याचे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले.
ते म्हणाले की, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार आवश्यक ते धोरण विकसित करीत आहेत. त्यामुळे आगामी काळात या क्षेत्रात भारत देशात आणि परदेशात मोठ्या प्रमाणात आगेकूच करणार आहे. करोनाची साथ आल्यानंतर भारतामध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी शैक्षणिक तंत्रज्ञान विकसित होत आहे. याला देशातूनच नाही तर परदेशातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. माहिती तंत्रज्ञान क्रांती झाली आहे. त्याचबरोबर दूरसंचार क्षेत्रातही भारत अग्रेसर आहे.
त्या दोन क्षेत्राचा वापर करून शिक्षण तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जामध्ये वाढ होत आहे. आगामी काळात याची फळे भारताला मिळतील. परंपरागत पद्धतीचे शिक्षण देणे चालूच राहणार आहे. मात्र तंत्रज्ञानाचा आधार घेऊन यामध्ये मूल्यवर्धन होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढत आहे. आगामी काळात भारतातील मनुष्यबळ अधिक कार्यक्षम होण्याची शक्यता खुली झाली आहे.
तंत्रज्ञानाच्या आणि शिक्षणाच्या एकीकरणाचा अभूतपूर्व प्रयोग सध्या भारतामध्ये चालू आहे. इंटरनेटमुळे या शिक्षणाचा फायदा शहराबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात यासाठी पूरक वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. त्यावेळी बैजूज या कंपनीचे संस्थापक बैजू रविंद्रन यांनी सांगितले की, भारतामध्ये शिक्षकाचा दर्जा उत्तम आहे. जागतिक बाजारपेठेत भारतीय शिक्षक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शिक्षणाचे काम करू शकणार आहेत. या क्षेत्रात भारताला मोठी संधी मिळाली आहे. तिचा फायदा करून घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.