मुंबई : राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षांमधील गोंधळ आणि त्यावरून झालेला विद्यार्थ्यांचा संतापाची घटना नुकतीच घडली होती. मात्र आता पुन्हा एकदा परीक्षांचा गोंधळ समोर आला आहे. म्हाडाच्या परीक्षेतील गोंधळ समोर आला आहे. यावरून आता पुन्हा एकदा राज्य सरकारवर विरोधी पक्ष भाजपाकडून जोरदार टीका सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरून संताप व्यक्त केला आहे.
राज्य सरकारला धारेवर धरत त्यांनी सवाल केला आहे कि, “भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस! किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे?” असे फडणवीस म्हणाले आहेत. “आरोग्य भरती परीक्षेचा घोळ! पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत, आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ! सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही!भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस! किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे? राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही?
आरोग्य भरती परीक्षेचा घोळ!
पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंतआता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ!
सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही!
भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 12, 2021
आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय ! नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका! दोषींवर कठोर कारवाई कराच!पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही?” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी आयोजित केलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा एका व्हिडीओद्वारे दिली आहे. परीक्षार्थींना होणाऱ्या त्रासाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी क्षमा मागितली आहे.