मुंबई – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मुंबईतील मेळाव्याला परवानगी द्यावी म्हणून कोर्टात धाव घेणाऱ्या कॉंग्रेसने अखेर हा मेळावाच रद्द केला आहे. कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी ही माहिती दिली. राज्यावर ओमायक्रॉनचे संकट असल्याने हा मेळावा पुढे ढकलण्यात येत असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.
भाई जगताप यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. राज्यावर संकट आहे. त्यामुळे मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. राज्य सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत. त्याचे पालन करतच कॉंग्रेसचा वर्धापन दिन साजरा केला जाईल, असे भाई जगताप यांनी सांगितले.
कॉंग्रेसच्या स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर 28 डिसेंबर रोजी हा मेळावा होणार होता. या मेळाव्याला राज्य सरकारने परवानगी नाकारली होती. त्यामुळे कॉंग्रेसने कोर्टात धाव घेतली होती. आम्ही 15 दिवसांपासून राज्यसरकारकडे मागणी करत होतो. पण आम्हाला उत्तर आले नाही. त्यामुळे आम्ही कोर्टात गेलो, असे भाईंनी सांगितले. तसेच पुढील मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हा मेळावा रद्द झाल्याचे आम्ही राहुल गांधी यांच्या कार्यालयात कळवले आहे. पण नवी तारीख जाहीर झाल्यावर शिवाजी पार्कातच राहुल गांधी यांचा मेळावा होईल, असे सांगतानाच कॉंग्रेसच्या स्थापना दिनाचा कार्यक्रम तेजपाल ऑडिटोरियममध्ये घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.