मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन ठेवण्याचं कांड परमबीर सिंग यांनीच केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केला. या प्रकरणी एनआयएने परमबीर यांचा जबाब नोंदवला. त्यानंतरच ते फरार झाले. मात्र एनआयएने मास्टरमांईड कोण आहे हे सांगितलं नाही. तरी एनआयएला एक दिवस खर काय ते सांगावच लागेल, असं मलिक यांनी म्हटलं.
नवाब मलिक यांनी म्हटलं की, परमबीर सिंह यांनी केंद्र सरकार आणि भाजपसोबत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याची योजना केली होती. त्यातूनच अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले. आता केंद्रीय यंत्रणा परमबीर सिंह यांना वाचविण्याचा प्रयत्न करतायत, असा आरोप मलिक यांनी केला.
दरम्यान सचिन वाझे याने देखील राज्य सरकारने नेमलेल्या आयोगासमोर अनिल देशमुख यांना पैसे दिले नाही, असा जबाब नोंदवला आहे. केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातूनच राज्य सरकारला आणि अनिल देशमुखांना बदनाम केल्याचं मलिक यांनी म्हटलं.