मुंबई – १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची न्यायालयीन कोठडी २७ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांनी पैशांची मागणी केली नसल्याचा जबाब न्यायालयासमोर दिला असला तरी अनिल देशमुखांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने आज देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ डिसेंबरपर्यंत वाढ केल्याने पुढील १३ दिवस त्यांना तुरुंगातच काढावे लागणार आहेत.
वाझेंचा खुलासा
राज्य सरकार नियुक्त चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझे यांनी आज, अनिल देशमुखांनी १०० कोटींच्या खंडणीची मागणी केलीच नव्हती, असा दावा केला. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण लागण्याची शक्यता आहे. तसेच वझे यांनी, ‘आपण शहरातील बार किंवा हॉटेलच्या मालकांकांकडून किंवा त्यांच्या संबंधितांकडून कधीही पैसे गोळा केले नाहीत, असं देखील चांदीवाल आयोगासमोर सांगितलं.
वाझेंचा हा खुलासा; देशमुखांना क्लीनचिट?
सचिन वाझेंनी १०० कोटी वसुलीच्या आरोपांबाबत केलेला हा खुलासा म्हणजे अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटींच्या आरोपांबाबत क्लीनचिट असल्याचंच बोललं जात आहे. मात्र, अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आल्यामुळे त्यांना तात्काळ दिलासा मिळणार नसल्याचं स्पष्ट झालय.