मुंबईमधील पोलीस ठाण्यांच्या गुन्हेगारीच्या तुलनेत तोफखाना, कोतवाली पुढे
नगर – मुंबईमधील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पोलीस ठाण्याच्या तुलनेत अधिक गुन्हे तोफखाना पोलीस ठाण्याहद्दीत घडत आहेत. परंतु, मुंबई येथील एका पोलीस ठाण्यात 30 ते 35 अधिकारी व शेकडो कर्मचारी कार्यरत असून तोफखाना पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षक व तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षकांसह 90 अल्पशा कर्मचाऱ्यांच्या बळावर या पोलीस ठाण्याची मदार आहे. तसेच कोतवाली पोलीस ठाण्याची परिस्थिती यावून वेगळी नाही.
खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, दंगा, अत्याचार, सोनसाकळी चोरी, चोऱ्या, घरफोड्या, दुचाकी, मोबाईल चोरी या घटनामध्ये वाढ झाली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीचा विस्तार पाहता शहराचा मध्यवर्ती भागापासून ते एमआयडीसीपर्यंत विस्तारलेला आहे. गुलमोहर रोड पासून तपोवन परिसर ते औरंगाबाद रोडपर्यंत या भागासाठी एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, सावेडीगाव, प्रोफोसर कॉलनी चौक या भागासाठी एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, तर बालिकाश्रम रोड ते कल्याण रोड या भागासाठी एक सहाय्यक पोलीस निरीक्षक अशी कामाची विभागी करण्यात आलेली आहे.
तोफखाना पोलीस ठाण्याच्या 2019 मधील वार्षिक गुन्ह्यांचा आकडा हा 757 एवढा आहे. या आकड्याचा विचार केल्यास एक उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचीच गरज व्यक्त होत आहे. परंतू सध्या एक पोलीस निरीक्षक, तीन सहाय्यक निरीक्षक, चार उपनिरीक्षक व 90 कर्मचारी अशा अल्प बळावर या पोलीस ठाण्याची मदार आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे मनुष्यबळ पाहिल्यास वाढत्या गुन्ह्यांच्या आकड्याच्या तुलनेत कमीच आहे. एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या मागे गुन्ह्यांच्या तपासणीचा आकडा हा आठ ते दहा पटीत एवढा मोठा आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवायला पोलिसांना अपयश येत असून, परिणामी गुन्हेगारीत वाढ होत आहे.
शहराचा उच्चभ्रू समजला जाणारा भाग सावेडी हा गुन्हेगारीबाबत पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. सावेडीचा हा भाग तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत येतो. चोरी आणि घरफोड्यांचे प्रमाणात गेल्यावर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे या भागात आणखी एका पोलीस ठाण्याच्या निर्मितीची मागणी होत आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी देखील नाशिक विभागाच्या विशेष महानिरीक्षकांमार्फत राज्य सरकारकडे यासंदर्भात प्रस्ताव दाखल केला होता. परंतु त्यावर योग्य असा पाठपुरावा होताना दिसत नाही.
पहिल्या गुन्ह्यातील तपास सोडून, घडलेल्या गुन्ह्याकडे द्यावे लागते लक्ष
गुन्ह्यांच्या तपासणीचा हा आकडा आठ ते दहा पटीत एवढा मोठा आहे. तपास करत असताना अधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मध्येच एखादा बंदोबस्ताचे काम येते. तर, एखाद्या गुन्ह्यात तपास करत असताना दुसरा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडतो. यामुळे पहिल्या गुन्ह्यातील तपास सोडून घडलेल्या गुन्ह्याकडे लक्ष द्यावे लागते.
एका सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडे 60 ते 70 गुन्ह्यांचा तपास
70 हजार रूपयांच्या पुढे मुद्देमाल चोरीला गेलेला असेल, तर त्या गुन्ह्याचा तपास निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असतो. तसेच, महिलासंदर्भात अत्याचाराचे गुन्हे, खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण, सोनसाखली, पोक्सो कलमान्वये दाखल गुन्हे अशा गुन्ह्यांचा तपास निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असतो. दाखल गुन्ह्यांचे प्रमाण जास्त असल्याने तपासासाठी येणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे. एका सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडे 60 ते 70 गुन्ह्यांचा तपास आहे.