नगर – महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सरुवात झाली आहे. यात जखणगाव येथील 80 शेतकऱ्यांच्या खात्यावर 55 लाख 70 हजार 570 रूपये जमा झाले आहेत. तर ब्राम्हणी येथील 591 शेतकऱ्यांच्या खात्यावर 4 कोटी 13 लाख 1.806 रूपये जमा झाले आहेत.दरम्यान, शुक्रवारी दुसरी यादी जाहीर होणार आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन लाख रूपये कर्ज असलेल्या शेतकऱ्याचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.
या कर्जमुक्ती योजनेतंर्गत सोमवारी नगर जिल्ह्यातील जखनगाव व ब्राम्हणी येथील शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिध्द करण्यात आली होती. यात जखणगाव येथील 80 शेतकऱ्यांचा समावेश होता. त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर 55 लाख 70 हजार 570 रूपये जमा करण्यात आले. तर ब्राम्हणी येथील 591 शेतकऱ्यांच्या खात्यावर 4 कोटी 13 लाख 1 हजार 806 रूपये जमा करण्यात आले आहेत. नगर जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांना त्रास होवू नये यासाठी प्रत्येक शाखेत बायोमेट्रीक मशीन बसवल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारी दुसरी यादी जाहीर होणार आहे.