नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राजाच्या हुकूमशाही फर्मानाने जनतेला कधीच विसरता न येणारी जखम दिली. त्यामुळे झालेल्या यातना देश कधीच विसरणार नाही, असे राहुल यांनी म्हटले.
देशात पुन्हा बनावट नोटांचा सुळसुळाट झाल्याचे आरबीआयने जारी केलेल्या अहवालावरून समोर आले आहे. त्याचा आधार घेऊन राहुल यांनी याआधी मोदींना लक्ष्य केले होते. मंगळवारी पुन्हा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर कडाडून टीका केली. नोटाबंदीच्या नावाखाली देशातील जनतेला 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी अचानकपणे रांगांमध्ये उभे करण्यात आले.
जनतेला आपलाच पैसा बॅंकांमधून काढण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यावेळी अनेकांच्या घरी विवाह समारंभ होते. लहान मुलांचे आणि वृद्धांचे उपचार सुरू होते. मात्र, कुणाकडेच पैसे नव्हते. तासन्तास रांगांमध्ये उभे रहावे लागल्याने अनेकांनी जीव गमावला, असे राहुल यांनी म्हटले.
देशात 2016 यावर्षी 18 लाख कोटी रूपयांची रोकड चलनात होती. आता चलनात असलेली रोकड 31 लाख कोटी रूपयांवर पोहचली आहे. त्यामुळे मोदींच्या डिजिटल इंडिया, कॅशलेस इंडिया या मोहिमांचे काय झाले हा प्रश्न उपस्थित होतो. नोटाबंदी जाहीर झाली त्यावेळी तो निर्णय म्हणजे राष्ट्रीय आपत्ती असल्याचे मी म्हटले होते.
तो निर्णय घेऊन मोदींनी चूक केल्याचा गैरसमज कुणी करून घेऊ नये. तो निर्णय जाणूनबुजून घेण्यात आला. सामान्य जनतेच्या पैशांतून मोदींचे मित्र असणाऱ्या भांडवलदारांचे लाखों कोटी रूपयांचे कर्ज माफ करण्याच्या आणि त्यांचा काळा पैसा पांढरा करण्याच्या उद्देशातून ते केले गेले, असा आरोपही राहुल यांनी केला.