नवी दिल्ली- भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे एलआसीने सोमवारी आपला ताळेबंद जाहीर केला. एलआयसीला चौथ्या तिमाहीत झालेला नफा 17 टक्क्यांनी कमी होऊन 2,409 कोटी रुपये झाला आहे. त्याचबरोबर एलआयसीने प्रतिशेअर केवळ दीड रुपयाचा लाभांश जाहीर केला. त्यामुळे एलआयसीच्या शेअरच्या किंमतीत तीन टक्क्यांची घट होऊन या शेअरचा भाव 811 रुपयापर्यंत खाली गेला होता.
त्यामुळे एलआयसीचे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. मागील वर्षी जानेवारी-मार्चच्या तिमाही दरम्यान एलआयसीला 2917 कोटी रुपयांचा नफा झाला होता. या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत एलआयसीने विमा प्रीमियममधून 1,44,158 कोटींची कमाई केली. मागील वर्षी या तिमाहीत 1,22,290 उत्पन्न मिळाले होते. जवळपास 17.88 टक्क्यांनी प्रीमियमद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
एलआयसीला चौथ्या तिमाहीत गुंतवणुकीतून 67,855 कोटी रुपयांची कमाई झाली. मागील वर्षी याच चौथ्या तिमाहीच्या काळात गुंतवणुकीतून 67,684 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
एलआयसी शेअर बाजारात लिस्ट होताना 949 रुपये प्रति शेअर इतकी किंमत निश्चित करण्यात आली होती. मात्र, जवळपास 9 टक्क्यांच्या डिस्काउंट दरात शेअर लिस्ट झाला. त्यानंतर शेअर दरात घसरण सुरू आहे. गुंतवणुकदारांना फायदा व्हावा यासाठी एलआयसी संचालक मंडळाकडून लाभांश मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, संचालक मंडळाने प्रति शेअर 1.5 रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे.
कंपनीने मागील वर्षीदेखील लाभांश दिला नव्हता. केंद्र सरकारला एलआयसीचे 25 टक्के शेअर विकायचे आहेत. आयपीओच्या माध्यमातून सरकारने फक्त 3.5 टक्के शेअर्स विक्री केली आहे. सरकार येत्या काळात एफपीओ देखील आणू शकते. एफपीओला गुंतवणुकदारांचा मोठा प्रतिसाद मिळावा यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आयपीओ मिळालेल्या गुंतवणुकदारांनाही फायदा मिळावा यासाठी एलआयसीकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.