मुंबई – केंद्रातील मोदी सरकारला आज सात वर्षे पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे राज्यसभेतील नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आज मोदींच्या नव्हे तर कॉंग्रेसच्याच पुण्याईवर देश चालला आहे. आणि कॉंग्रेसमुळेच आज देश तगून राहिला आहे. मोदींनी आपल्या सात वर्षांच्या राजवटीचं आत्मपरीक्षण करून आपल्यात व देशात सुधारणा घडवून आणाव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, पंडित नेहरूंपासून मनमोहनसिंग यांच्यापर्यंत कॉंग्रेसी पंतप्रधानांनी या देशाची मूलभूत उभारणी केली. त्यांनी सुरू केलेल्या योजना आजही सुरू आहेत. त्यामुळे मोदी सरकारने आत्मचिंतन करून देशासाठी आणखी मेहनत घेण्याची गरज आहे. देशातील अनेक प्रश्न गेल्या सात वर्षांत सुटू शकलेले नाहीत.
या देशातील नागरिकाला अदानी किंवा अंबानी व्हायचे नाही, त्यांना फक्त त्यांचा रोजगार हवा आहे. त्यांना आरोग्य शिक्षण या क्षेत्रातील समस्या सुटलेल्या हव्या आहेत. आज मोदी सकार बिगर भाजपशासित राज्यांशी दुजाभावाने वागत आहे, असे नमूद करताना त्यांनी म्हटले आहे की, देशातील सर्वच राज्यांचे पालकत्व केंद्र सरकारच्या हातात आहे. त्यांनी आपल्या सर्वच अपत्त्यांना समान पद्धतीने वागवले पाहिजे.