नवी दिल्ली – आपल्या सात वर्षांच्या कारभारात देशाने अनेक राष्ट्रीय अभिमानाचे क्षण अनुभवले आहेत, असे नमूद करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मन की बात या कार्यक्रमात गेल्या सात वर्षांत सरकारने राबवलेल्या अनेक योजना व उपाययोजनांचा उल्लेख केला. त्यांच्या सरकारला सत्तेवर येऊन आज सात वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त त्यांनी ही माहिती सादर केली.
ते म्हणाले की, आमच्या सरकारने अनेक क्षेत्रात यश मिळवले असले तरी काही बाबतीत नवे प्रयोगही करावे लागले आहेत. देशात पसरलेल्या कोविडच्या साथीचा उल्लेख करून ते म्हणाले की, या साथीने संपूर्ण देशात आपले हातपाय पसरले. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा धक्का बसला. तथापि, या विषाणूजन्य आजारावर भारत विजय मिळवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
गेली सात वर्षे आपल्या सरकारने सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हा मंत्र जपत काम केले. भारतवर दबाव टाकून भारताला मागे खेचणाऱ्या शक्तींना आपण गेल्या सात वर्षांत चोख प्रत्युत्तर दिले आहे, असे नमूद करून त्यांनी म्हटले आहे की, गेल्या सात वर्षांत भारताने आपल्या राष्ट्रीय सुरक्षेशी कधीही तडजोड केली नाही, या कालावधीत आपल्या लष्कराची ताकदही वाढली आहे.
अनेक जुने वाद आपण सोडवले असून, त्यामुळेच काश्मीर आणि देशाचा ईशान्येकडील भागात आज शांतता नांदत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या सात वर्षांत देशातील केवळ साडेतीन कोटी लोकांना नळाने पिण्याचे पाणी पुरवले गेले आहे, पण आम्ही गेल्या 21 महिन्यांत साडेचार कोटी घरांना पिण्याचे पाणी नळाने पुरवले आहे. आयुष्यमान भारत योजने अंतर्गत गरिबांना मोफत उपचार केले गेले. त्यातून त्यांना नवीन जीवन दिले गेले आहे, असा दावाही त्यांनी केला.
गेल्या 70 वर्षांत ज्यांच्या घरात वीज पोहोचली नव्हती त्यांच्या घरात आम्ही वीज पोहोचवली. देशात अनेक ठिकाणी रस्ते केले गेले आणि अनेकांना घरे दिली गेली, असा दावाही मोदींनी केला. करोनाचा उल्लेख करून ते म्हणाले की, या रोगाने जगातील अनेक देशांना फटका बसला आहे. पण या लाटेवर आपण विजय मिळवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.