रमेश भुजुगडे : कुरुंदवाड, भैरववाडीच्या ग्रामस्थांनी दिले “माणदेशी’ला धन्यवाद
म्हसवड – कुरुंदवाड व भैरववाडी या सधन गावातील भीषण पूरस्थितीत ग्रामस्थांच्या मदतीला श्रीमती चेतना सिन्हा धावून आल्यानेच अडीच हजार जनावरे वाचू शकली, असे भावपूर्ण उद्गार कुरुंदवाडचे माजी नगरसेवक रमेश भुजुगडे यांनी काढले.
कृष्णा नदीच्या पुरात बुडालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड व भैरववाडी येथील अडीच हजार जनावरांसाठी शासनाचे अनुदान न घेता म्हसवडच्या माणदेशी फाउंडेशनने चारा छावणी सुरू करून ओला चारा, मूरघास व गोळी पेंडचे 15 दिवस मोफत वाटप केले. या चारा छावणीच्या सांगता समारंभात ते बोलत होते. माणदेशी फाउंडेशन व महिला बॅंकेच्या संस्थापिका चेतना सिन्हा, मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी, माणदेशी चॅम्पियन्सचे करण सिन्हा, डॉ. सुनील चव्हाण, सुनील कुलकर्णी, स्वप्निल कुलकर्णी, भाग्यश्री कुलकर्णी, शरदचंद्र पराडकर, रामचंद्र मोहिते, दिलीप सुतार, रणजित डांगे, उदय डांगे, अक्षय आलासे, कुमार बडगर, हणमंत माने, तानाजी करमरे, संभाजी करमरे, अनिल आंबाडे, सुभाष वावरे, आप्पा वावरणे, मनोज शिंदे, आकाराम वावर, दादा वावरणे, गिरीश हुद्दार उपस्थित होते.
भुजुगडे म्हणाले, कृष्णा नदीस ऑगस्ट महिन्यात आलेल्या प्रलयकारी पुरातून माणसे सुरक्षित बाहेर पडली; परंतु पाण्यात बुडालेल्या घरांच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील छतांवर मोठी जनावरे तरुणांनी कशीबशी नेल्याने ती वाचली. शेतातील पिकेही बुडाल्याने जनावरांना चारा मिळेनासा झाला. येथील भाग्यश्री कुलकर्णी यांच्यामार्फत चेतना सिन्हा व रेखा कुलकर्णी यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली. चेतना सिन्हा यांनीही तातडीने ओला चारा, मूरघास, गोळी पेंड भरलेली वाहने पुराच्या पाण्यात बुडालेला रस्ता शोधत पोहोचवली. पंधरा दिवस चारा छावणी सुरू ठेवून त्यांनी आमची अडीच हजार जनावरे जगवली.
रेखा कुलकर्णी म्हणाल्या, यंदाच्या दुष्काळात माणदेशीने सरकारच्या मदतीविना म्हसवड येथे साडेआठ हजार जनावरांसाठी तीन महिने चारा छावणी चालवली. शरदचंद्र पराडकर, स्नेहल कुलकर्णी, रणजित डांगे, रामचंद्र मोहिते, दिलीप सुतार आदींनी पूरग्रस्त माणदेशी फाउंडेशनचे 15 कर्मचारी, चेतना सिन्हा व रेखा कुलकर्णी यांचे आभार मानले.
व्यवसाय प्रशिक्षणासाठी लवकर शाखा
चेतना सिन्हा म्हणाल्या, कुरुंदवाड व भैरववाडी परिसरातील अडीच हजार जनावरांसाठी सरकारी मदतीविना 15 दिवस चारा छावणी चालवली. पुरामुळे पडझड झालेली गरीब कुटुंबांची घरे बांधून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. शालेय मुलींना मोफत सायकल वाटप व महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी लवकरच शाखा सुरू केली जाईल.