प्रशासनाचे दुर्लक्ष : नागरिक दुर्गंधीने त्रस्त
पिंपळे गुरव – पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना नदीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु महापालिका प्रशासन नदी सुधार प्रकल्पाकडे व नदी पात्राच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याने नदीचे आरोग्य बिघाडले आहे. पवना नदीपात्रात सांडपाणी व दूषित पाणी सोडण्यात येत असल्याने जलप्रदूषण वाढले आहे. परिणामी नदी परिसरात दुर्गंधी येत असून नागरिक त्रस्त आहेत. तसेच दापोडी येथील घाटाची दुरवस्था झाल्याने नागरिकांना घाटावर जाणे कठीण झाले आहे.
दापोडी येथे पवना नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे. नदीच्या दोन्ही तीरावर शहरातून वाहून आलेला कचरा, इतर साहित्य वाहत येऊन साठले आहे. तो कचरा सडल्याने आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नदी पात्रात दूषित व सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदी परिसरात डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुन्हा दाखल केला आहे. तरीही महापालिका प्रशासनाला जाग येत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नदीच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
स्वच्छतेकडे कानाडोळा
दापोडी, सांगवी परिसरात उत्तर भारतीय नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यामुळे दिवाळीत नदी घाटावर छट पूजा करण्यासाठी घाट स्वच्छ असणे गरजेचे आहे. परंतु येथील घाटावर गवत, झाडेझुडुपे उगवली आहेत. त्यामुळे घाटाची दुरवस्था झाली आहे. महापालिका प्रशासनाने स्वच्छतेकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना घाटाचा वापर करणे कठीण झाले आहे.