पिंपरी – उत्तर भारतातील अनेक भागांत थंडीची लाट आली आहे. या भागाकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह काही प्रमाणात वाहण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यातही हवामान कोरडे असल्याने पुन्हा थंडी वाढू लागली आहे. पुढील तीन ते चार दिवस पिंपरी-चिंचवडसह राज्यातील अनेक भागांत थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्राच्या नैऋृत्य भागात कमी दाबाचे क्षेत्र होते. आता हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकत आहे. त्यातच दक्षिण भारतातील पूर्व भागातील बंगालचा उपसागराच्या नैऋृत्य भाग व श्रीलंकेची किनारपट्टी या दरम्यान चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
यामुळे उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह राज्याच्या दिशेने पुन्हा काही प्रमाणात सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा झपाट्याने खाली आला आहे.