कराड – 2014 निवडणुकीपूर्वी सवंग लोकप्रियतेसाठी मोठमोठ्या, घोषणा केल्या गेल्या. जाहिरातबाजी केली, अच्छे दिन येणार, खात्यात पंधरा लाख रुपये जमा होणार, शेतकरी कर्जमाफी होणार, दोन कोटी तरुणांना दरवर्षी नोकऱ्या देणार, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देणार यासारख्या घोषणांची अंमलबजावणी झाली नाही. सतत खोटं बोलून सर्वसामान्य जनतेला फसवण्याचं काम या सरकारने केले.
यावरून खोटं बोलं पण रेटून बोलं अशी सरकारची भावना असल्याचा आरोप बाळासाहेब पाटील यांनी केला. निसराळे ता. सातारा येथे आयोजित केलेल्या कार्यकर्त्याच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. सभेस चंद्रकांत जाधव, रमेश मोहिते, शशिकांत घोरपडे, संजय थोरात, संजय कुंभार, जयवंतराव मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
ते म्हणाले, भूषणगडापासून ते भैरवगडापर्यंत कोणताही भेदभाव न करता पूर्ण मतदार संघामध्ये समान न्यायाने निधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र विरोधकांकडे बोलण्यासारखे काही नसल्याने विनाकारण टीका केल्या जात आहेत. लोकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण केला जात आहे. यशवंत विचारांचा वारसा लाभलेल्या आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे रहा.