सातारा – कोयना धरण क्षेत्रातील पुनर्वसितांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा आणि त्यांचे शंभर टक्के पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये एक हजारांहून अधिक आंदोलक सहभागी झाले. पुनर्वसितांचा हा प्रश्न सोडवण्याकरिता मुख्यमंत्र्यांनी तातडीने वरिष्ठ पातळीवर बैठक घ्यावी, अशी मागणी डॉ. पाटणकर यांनी यावेळी केली.
डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयना धरणग्रस्तांनी राजवाडा येथून दुपारी साडेबाराच्या दरम्यान इशारा मोर्चा काढला. जमीन हक्काची नाही कोणाच्या बापाची, अशा जोरदार घोषणा देत धरणग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. यावेळी युवा मोर्चा आघाडीचे चैतन्य दळवी, देवानंद शिंदे आणि त्यांचे विविध सहकारी उपस्थित होते. मोर्चा राजपथावरून मोती चौक, देवी चौक, शाहू चौक, पोवई नाक्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.
प्रवेशद्वारावर या मोर्चाचे सभेमध्ये रुपांतर झाले. यावेळी डॉ. भारत पाटणकर म्हणाले, “”तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे सर्व विषय चर्चेअंती अंतिम झाले होते. येथील खरे धरणग्रस्त 2500 ते 2700 असताना अंशतः जमीनधारक 1500- 2000 धरणग्रस्त असे आकडे निश्चित होत आहेत.
धरणग्रस्तांना जमीन वाटप करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट बनवण्यात आली आहे. त्यामुळेच हा प्रश्न शासकीय पूर्वग्रहातून जटिल बनला आहे. कोयना धरणाचे पाणी सांगली व सातारा जिल्ह्यांमध्ये जाते आणि सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या लाभक्षेत्रातील जमिनी धरणग्रस्तांना देण्याची प्रक्रिया ठरली असताना त्यामध्येसुद्धा बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न 62 वर्षानंतर आजही कायम आहेत.”
“धरणग्रस्त मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवावा’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः कोयना धरणग्रस्त आहेत. त्यांना या प्रश्नाची आंतरिक तळमळ आहे. त्यामुळे हा प्रश्न तत्काळ वरिष्ठ पातळीवर बैठक आयोजित करून सोडवला जावा, अशी मागणी डॉ. भारत पाटणकर यांनी यावेळी केली. यासंदर्भात तातडीने बैठक आयोजित न झाल्यास यापुढे सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सनदशीर मार्गाने धरणग्रस्तांचे इशारा मोर्चे सुरूच राहतील, असा इशारा डॉ. पाटणकर यांनी दिला.