सातारा -वारकरी संप्रदायाचे प्रमुख मार्गदर्शक बंडातात्या कराडकर यांनी साताऱ्यात राज्य सरकारवर वेगवेगळ्या टीकेची राळ उडवून दिली. शासनाचे वाइन धोरण म्हणजे “ढवळ्याशेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला,’ असे आहे. यातला ढवळा म्हणजे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि त्यांचा ज्याला गुण लागला ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, असे सांगत त्यांनी या वाइन धोरणाचा वारकरी संप्रदाय समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही दिला.
तसेच बड्या बड्या मंत्र्यांची मुले सर्रास दारू पितात. अगदी काही महिला लोकप्रतिनिधीही याला अपवाद नाहीत, असा आरोप बंडातात्या यांनी जाहीरपणे करून एकच खळबळ उडवून दिली.
व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र यांचे साताऱ्यात दंडुका दंडवत आंदोलन झाले. या आंदोलनादरम्यान मार्गदर्शनानंतर बंडातात्या कराडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी आक्रमकपणे टीका केली. बंडातात्या म्हणाले, “”शासनाच्या डोळ्यावरील ही मद्य धुंदी उतरवण्यासाठी वारकरी संप्रदाय वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन सातत्याने करतच राहील.
याची गंभीर दखल राज्य शासनाने घ्यावी. वाइन विक्रीचे धोरणात्मक निर्णय अजित पवार यांचे आहेत. ते म्हणजे ढवळा असून त्यांच्या जोडीने काम करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पवळा आहेत. निर्णय अजित पवार यांनी घ्यायचा आणि तो मुख्यमंत्र्यांनी राबवायचा, हे आजपर्यंतचे महाविकास आघाडीचे धोरण आहे. मात्र, आम्ही महाराष्ट्र राज्य मद्याच्या आहारी जाऊ देणार नाही. भल्याभल्या मंत्र्यांची पोर सर्रास दारू पितात अशी किती तरी उदाहरणे देता येतील.” हेसांगताना त्यांनी काही नेत्यांच मुलांची नावेही घेतली.