पुणे – देशात एकीकडे वाढत्या शहरीकरणामध्ये कर्करोगाचे प्रमाण चिंताजनक वाढलेले दिसून येत आहे. 2020 मध्ये भारतात 13.5 लाख नवीन कर्करोगग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. बदललेली जीवनशैली जोखमीचा घटक ठरत असून, बदलेला आहार आणि तणाव याचे प्रमाण अधिक आहे, असे मत कर्करोग तज्ज्ञांनी व्यक्त केले.
4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिनानिमित्त शहरातील कर्करोग तज्ज्ञांची मते जाणून घेण्यात आली. त्यामध्ये वरिष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. शोना नाग म्हणाल्या, कर्करोगाचे निदान झाल्यावर अनेक रुग्ण मला प्रश्न विचारतात की चांगली जीवनशैली, कोणतेही चुकीची सवय नाही आणि कुटुंबात वैद्यकीय इतिहास नसताना कर्करोग झाला कसा. त्यावर उत्तर देणे कठिण जाते. कारण सध्याच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम व्यक्तींच्या शरिरावर होत आहे. त्याचे निदान वेळेत होत नसल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढते. ते टाळण्यासाठी निदान आणि त्याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.
बदलेला आहार, वाढता तणाव यासह उशिरा अपत्यप्राप्तीचा प्रयत्न, स्तनपान कमी काळ करणे, या सर्व गोष्टींमुळे विशेषत: शहरात स्तनाच्या कर्करोगाची जोखीम वाढत आहे. भारतीय महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाच्या (सर्व्हिकल) कर्करोगाचे प्रमाण 35 टक्के आहे. तर पुरूषांमध्ये फुफ्फुस व मौखिक कर्करोगाचे प्रमाण 15 ते 20 टक्के आहे, असे डॉ. नाग यांनी सांगितले.
मुत्रविकारतज्ज्ञ प्रा. डॉ. सुरेश पाटणकर म्हणाले, रुग्णालयाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये 35 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यात 7 लोकांना प्रोस्टेट कॅन्सर दिसून आला. या लोकांना दुसऱ्या कोणत्याही विशेष अशा लघवीच्या तक्रारी नव्हत्या. यामध्ये विशेष प्रोस्टेट ग्रंथीची इलास्टोग्राफी व क्यु ऍनालेसीस अशी एक वेगळी चाचणी केली, ज्यामुळे शारीरिक परीक्षण व पीएसए टेस्ट नॉर्मल असूनही रोगाचे निदान होण्यास मदत झाली. त्यामुळे 60 वर्षांवरील पुरुषांनी वर्षातून एकदा तरी अशा स्वरूपाच्या तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
हे केले पाहिजे…
कर्करोगाच्या प्रतिबंधामध्ये आरोग्यदायी जीवनशैली, तंबाखू व धूम्रपान सेवन कटाक्षाने थांबवावे. तसेच महिलांनी स्तनासाठी स्व-परीक्षा, मॅमोग्राम, पॅपस्मिअर तसेच धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी फुफ्फुसासाठी कमी डोसचा सीटी स्कॅन आणि पुरूषांनी पीएसए टेस्ट करणे गरजेचे आहे.