मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी आयोजित केलेली परीक्षा अचानक रद्द करण्यात आली. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाला सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. यावरुन आता भाजपाने महाविकास आघाडी सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे.
भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणी मुख्यमंत्र्यावर सवाल उपस्थित केला आहे. “आरोग्य खात्याच्या परीक्षांचा बोजवारा उडाला, आता गृहनिर्माण खाते त्यांचा कित्ता गिरवत आहे. भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना मुख्यमंत्र्यांनी मौन पाळले आहे. माफी मागणाऱ्या नवाब मलिकांचे गुडगोईंग म्हणून कौतुक करणारे मुख्यमंत्री आव्हाड आणि टोपेंबाबत पक्षपात करत आहेत काय?” असा सवाल केशव उपाध्ये यांनी ट्विट करत विचारला आहे.
आरोग्य खात्याच्या परीक्षांचा बोजवारा उडाला, आता गृहनिर्माण खाते त्यांचा कित्ता गिरवत आहे. भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना मुख्यमंत्र्यांनी मौन पाळले आहे. माफी मागणाऱ्या नवाब मलिकांचे गुडगोईंग म्हणून कौतुक करणारे मुख्यमंत्री आव्हाड आणि टोपेंबाबत पक्षपात करत आहेत काय?
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 13, 2021
म्हाडा परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर येताच या प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाला सहा आरोपींना पकडण्यात यश आले आहे. या आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता या सर्व आरोपींना न्यायालयाने १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे.
याआधी आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीच प्रश्नपत्रिका फोडल्याचे समोर आले होते.