Jitendra Awhad on Ajit Pawar । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे बारामती लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर दुसरीकडे प्रचार करताना दिसत आहेत. शिरूर लोकसभेत त्यांचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिरूरमध्ये एका सभेत घेतली. यावेळी अजित पवार यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा टीका केली. यावेळी त्यांनी,“मी शरद पवारांचा मुलगा असतो तर..”, अशी खंत अजित पवारांनी पुन्हा एकदा व्यक्त केली. अजित पवार यांनी हा आरोप केल्यांनंतर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर खोचक टीका केलीय.
“…पण, तुम्ही केवळ रक्ताचे वारसदार” Jitendra Awhad on Ajit Pawar ।
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत, “राजरजवाडे कधीच संपले. मात्र, अजूनही काही लोकांच्या डोक्यातून सरंजामशाही काही जात नाही. रक्ताच्या वारसांनीच सिंहासनावर बसले पाहिजे; तो त्यांचाच हक्क आहे, अशीच मानसिकता अजित पवार यांच्या वाक्यातून दिसून येते. तुमच्यापेक्षा ज्येष्ठ, तुमच्यापेक्षा प्रगल्भ नेते २००४ मध्ये आदरणीय शरद पवार यांच्या जवळ होते. त्यामध्ये आर. आर. पाटील, जयंत पाटील, डॉ. पद्मसिंह पाटील, दत्ता मेघे, विजयसिंह मोहिते-पाटील, छगन भुजबळ आदी नेते होते. पण, तुम्ही केवळ रक्ताचे वारसदार आहात, म्हणून तुम्हालाच द्यायला पाहिजे, या भ्रमात तुम्ही का आहात? आणि सरंजामशाहीच्या विरोधातच आदरणीय शरद पवार आहेत. नाही तर त्यांनी उदयनराजेंविरोधात एक साधा माथाडी कामगार शशिकांत शिंदे दिला नसता.” असेही त्यांनी म्हटले.
बारामतीचे मतदान संपले तरी शरद पवार लक्ष्य Jitendra Awhad on Ajit Pawar ।
बारामती मतदारसंघात मतदानानंतरही अजित पवार गटाकडून शरद पवार यांनाच लक्ष्य करण्यात येत आहे. यावरुनही जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, आता निवडणूक संपली. जेवढ्या शिव्या द्यायच्या होत्या. तेवढ्या शिव्या देऊन झाल्या. जेवढ्या गडबडी निवडणुकीत करायच्या होत्या. तेवढ्या करून झाल्या. आता कशाला शरद पवार… शरद पवार करताय? तुम्हाला जेवढे दिले; तेवढे त्यांच्या सख्या मुलीलाही दिलं नाही. केंद्रात मंत्री केले ते सुर्यकांताताई पाटील आणि आगाथा संगमा यांना! मात्र, सुप्रियाताई यांना केंद्रात असे कोणतेही मोक्याचे पद दिले नाही. कारण, शरद पवारांचा संरजामशाहीवर विश्वासच नाही आणि तुमच्या विचारांतून सरंजामशाही जातच नाही.