मुंबई – टोमॅटो, कांदा दरवाढीला केंद्र सरकारने हस्तक्षेप करून लगाम घातला असला तरी तूर-उडीद डाळीच्या दरवाढीकडे मात्र साफ दुर्लक्ष केले आहे. राज्य सरकारही स्वस्त डाळ पुरवठ्याबाबत उदासीन असल्याने जनतेला मात्र महागाईला तोंड द्यावे लागत आहे.
तूर-उडीद डाळींचे दर ऐन सणासुदीच्या काळात वाढत असताना मात्र केंद्र व राज्य सरकारने त्यात अजून हस्तक्षेप न करण्याचे धोरण स्वीकारलेले आहे.
चांगल्या प्रतीच्या तूरडाळीचा दर प्रतिकिलो 175-200 रुपये तर उडीद डाळही 150-160 रुपये प्रति किलोच्या घरात पोहोचली आहे. सरकारने उपाययोजना न केल्यास हे दर वाढतच जाणार आहेत.
डाळींच्या साठ्यांवर मर्यादा घालण्यापलीकडे केंद्र सरकारने काहीच केलेले नाही. या साठा मर्यादेच्या कठोर अंमलबजावणीकडे नागरी पुरवठा विभागाचे लक्ष नाही.