नवी दिल्ली : देशातील तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. या राज्यांमध्ये मेघालय, त्रिपुरा आणि नागालॅंडचा समावेश आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज या विषयीची अधिसूचना जरी करणार आहे. याविषयीची माहिती आयोग दुपारी पत्रकार परिषद घेऊन देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ईशान्येतील तीन राज्यांमध्ये यंदा विधानसभा निवडणुका होणार आहेत. आज निवडणूक आयोग दुपारी अडीच वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या अधिसूचनेबाबत सविस्तर माहिती देणार आहे. मेघालय विधानसभेत भाजपची स्थितीही विशेष नाही. विधानसभेच्या 60 जागा असलेल्या मेघालयमध्ये भाजपकडे केवळ 2 जागा आहेत, तर केवळ 9.6 टक्के वोट शेअर आहे.
दुसरीकडे लोकसभेच्या जागांबाबत बोलायचं झालं तर राज्यात लोकसभेच्या एकूण दोन जागा आहेत आणि त्या दोन्हीही भाजपकडे नाहीत. येथे एक जागा काँग्रेसकडे आणि एक जागा एनपीपीकडे (नॅशनल पीपल्स पार्टी) आहे.
ईशान्येतील आणखी एक राज्य नागालँडमध्ये भाजपची राजकीय स्थिती फारशी खास नाही. येथे भाजपकडे 15.3 टक्के मतांसह 60 पैकी केवळ 12 जागा आहेत. मात्र, त्रिपुरामध्ये भाजपची स्थिती खूपच चांगली आहे. येथे लोकसभेच्या दोन जागा असून भाजपकडे दोन्ही आहेत. त्याचबरोबर विधानसभेतही भाजपचं बहुमत आहे. 60 पैकी 36 जागा भाजपच्या ताब्यात आहेत.