तिरूनेलवेली – आम्ही मोदींपेक्षाही कट्टर राज्यकर्त्यांना पुरून उरलो आहोत. आम्ही ब्रिटीशांना या देशातून घालवून दिले. आता मोदींनाही नागपुरला परत पाठवून देऊ असे प्रतिपादन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथील सभेत बोलताना केले. मोदी हे अत्यंत कडवे विरोधक आहेत, ते विरोधकांना नाहीसे करण्यासाठी टपून बसले आहेत, पण आम्हीं मात्र अहिंसा आणि प्रेमाच्या मार्गाने मोदींना पराभूत करू असेही त्यांनी म्हटले आहे.
येथील सेंट झेव्हीएर कॉलेज मध्ये प्राध्यापकांच्या एका मेळाव्यात ते बोलत होते. ते तामिळनाडुच्या निवडणूक प्रचाराच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या प्रचाराचा दुसरा दिवस होता. ते म्हणाले की पैशाच्या बळावर विरोधकांना दाबून टाकण्याचा जो प्रयत्न ते करीत आहेत, तो प्रयत्न आम्ही हाणून पाडू आणि त्यांना नागपुरला परत पाठवू.
त्यांच्यापेक्षाहीं मोठा शत्रू (ब्रिटीश) आम्ही परत पाठवून दिला आहे त्यांच्या तुलनेत मोदींचे आव्हान आमच्या पुढे फार मोठे आव्हान नाही. केंद्रातील भाजपचे सरकार हिंदुंचे सरकार असल्याचे भासवत असले तरी खरे हिंदुत्व त्यांनी लक्षातच घेतलेले नाही असे ते म्हणाले. खरे हिंदुत्व दुसऱ्याला दुखवण्यास, किंवा त्यांना मारपीट करण्यास किंवा त्यांची हत्या करण्यास शिकवत नाही, पण हे लोक मात्र हिंदुत्वाच्या नावाने या साऱ्या गोष्टी करीत आहेत.
सगळ्याच धर्मांची शिकवण एक सारखी आहे. त्यांनी दुसऱ्या ‘धर्माच्या लोकांचा सन्मान करण्यास शिकवले आहे. पण यांनी मात्र ही शिकवणूक धुडकाऊन लावली आहे. केंद्र सरकारच्या नवीन शिक्षण धोरणावर टीका करून त्यांनी म्हटले आहे की, विद्यार्थी, शिक्षक किंवा शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही संबंधातांशी चर्चा न करताच त्यांनी हे धोरण राबवले आहे. त्यामुळे या धोरणावर सर्वच संबंधीत घटक नाराज आहेत.