मुंबई – राज्यात विशेषतः मुंबईत लसीकरणाचा बोगसपणा झाल्याचे प्रकरण समोर आल्याने एसआयटीमार्फत तपास करण्यात येत आहे. मात्र केंद्राने राज्याला अंधारात ठेवल्याने असे प्रकार घडत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक म्हणाले, लसीकरणाचा बोगसपणा होण्याचे मुख्य कारण खासगी लोकांना आणि खासगी हॉस्पिटल यांना लस वितरीत करण्यात आली. त्याची माहिती राज्यांना देण्यात आलेली नाही किंवा डाटा राज्याला शेअर करण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुरुवातीपासून जर खासगी लोकांना लस देत असताना राज्यांना माहिती दिली असती तर नगरपालिका, महापालिका आणि स्थानिक यंत्रणा त्यावर नियंत्रण ठेवू शकल्या असत्या. त्यामुळे अशाप्रकारचा बोगसपणा झाला नसता, असा टोला त्यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
त्याचबरोबर ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि निर्णय याबाबत राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही, अशा शब्दांत मलिक यांनी राज्यपालांच्या पत्रावरही नाराजी व्यक्त केली.