शिक्रापूर,(वार्ताहर)- सध्या ग्रामीण भागात हॉटेल व्यवसायामुळे भटक्या श्वानांची संख्या वाढत आहे. श्वान दंशाच्या घटना घडताना शिक्रापूर ग्रामपंचायतीने नागरिकांचे रेबीजपासून संरक्षण करण्यासाठी सर्व श्वानांचे लसीकरण तसेच नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्वानांबाबत उपक्रम राबवणारी शिक्रापूर ही पुणे जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
शिक्रापूर येथे दोनशेहून अधिक हॉटेल, चायनीजसह आदी व्यवसाय झालेले असताना गावामध्ये भटक्या श्वानांची संख्या देखील वाढलेली आहे. अनेकदा श्वान दंश होण्याच्या घटना देखील वाढत आहेत. मात्र, या भटक्या श्वानांची उत्पत्ती वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि नागरिकांचे रेबीजपासून संरक्षण करण्यासाठी भटक्या श्वानांचे लसीकरण व नसबंदी करण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला आहे.
नुकतीच पुण्यातील पेट फोर्स या संस्थेच्या माध्यमातून गावामध्ये सरपंच रमेश गडदे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष खैरे यांसह आदींच्या उपस्थितीत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. पेट फोर्स संस्थेच्या माध्यमातून गावातील भटक्या श्वानांना पकडून त्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण करुन तसेच नसबंदी करुन प्रत्येक श्वानाला त्याबाबत लेबल लावून पुन्हा गावामध्ये सोडण्यात येणार आहे. लसीकरण व नसबंदी झालेल्या प्रत्येक श्वानाची वर्षभरातील अपघातासह आदी देखभाल देखील पेट फोर्स संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.