नवी दिल्ली- करोनाचा संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या रुग्णांचे मृतदेह तातडीने त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात यावेत. या रुग्णांना करोनाची लागण झाली आहे की नाही, याच्या चाचणीचा रिपोर्ट मिळेपर्यंत वाट बघत बसू नये, अशी स्पष्ट सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. त्याचबरोबर मृतदेहांची विल्हेवाट सरकारी मार्गदर्शक सूचनांनुसारच करण्यात यावी, असेही केंद्र सरकारने म्ह्टले आहे.
कोविड-19 चा संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या आणि संसर्ग झाल्याचे निष्पन्न झालेल्या रुग्णांच्या मृतदेहांबाबत वाद उत्पन्न व्हायला लागले होते. संशयित रुग्णांबाबतचे प्रयोगशाळांचे रिपोर्ट मिळेपर्यंत मृतदेह नातेवाईकांकडे दिले जात नव्हते. त्यामुळे या संदर्भात आरोग्य मंत्रालयाचे आरोग्य सेवा महासंचालक डॉ राजीव गर्ग यांनी लिहीलेले पत्र बुधवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आले आहे