मनस्विनी साखरदांडे
खरेच इतके सोपे असते विसरणे? सोपे तर नाहीच; पण मग डोक्यात तुम्ही किती गोष्टी साठवून ठेवणार यालाही काही मर्यादा आहेतच ना? तेव्हा जरा साफसफाई करण्याचे मनावर घ्यायलाच हवे. काय ठेवायचे आणि काय काढून टाकायचे? कचरा सगळा टाकून देऊ या. निरुपयोगी विचार, अपेक्षाभंग, मनस्तापाचे अनुभव… काय उपयोग यांचा?
आपल्या मनामध्ये अनेकांविषयी नकारार्थी विचार साठलेले असतात. परिस्थिती, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्याविषयी राग, असूया यांनी मन भरून गेलेले असते. तसे झाले तर सकारात्मक विचारांना मनात प्रवेश करण्यास वाव कसा मिळणार? आधीच भरलेल्या कळशीत स्वच्छ, ताजे पाणी कसे भरणार? म्हणून चांगल्या आशावादी विचारांना मनामध्ये सामावून घेण्यासाठी आधी जागा तयार करा. ती कशी करायची? तर प्रथम स्वतःच्या मनाचा शोध घ्या.
आतापर्यंत तुम्ही काय करीत होतात? काहीजण अप्रिय गोष्टी आठवल्या की, त्यांना मनाच्या तळाशी गाडून पुढील वाटचाल करीत असतील. काहीजण जी शल्ये मनात रुतून बसली असतील, ती मधूनमधून गोंजारत असतील. पण आता जरा नवीन विचार करायला हवा. जे जे दुःखद होऊन गेले असेल आपल्या आयुष्यात, त्या कोणत्याच गोष्टीला आपण थारा द्यायचा नाही. तुम्हाला असा अनुभव येत असेल की, रोजच्या जीवनचक्रात काही गोष्टींची आपल्याला आठवणही राहत नाही. पण एखाद्या रात्री किंवा आपण अगदी एकटे असताना, कधी अगदी जिवाभावाच्या व्यक्तीशी बोलत असताना, अचानक हृदयात रुतून बसलेले हे सल उफाळून येतात.
याचे कारण हे सारे आपण मनात सांभाळून ठेवले आहे. हे आता फेकून द्यायचे आहे. कसे साधायचे हे अवघड काम? त्यासाठी प्रथम एका जागी शांतपणे बसा. मग ज्या गोष्टी तुम्हाला सलत राहतात, त्या विचारांच्या पृष्ठभागावर आणा. ज्यामुळे तुमचे मनस्वास्थ्य हरवते असा प्रसंग, व्यक्ती डोळ्यासमोर आणा आणि आता इथून पुढील जीवनात या प्रसंगाची, अनुभवाचे काहीही नामोनिशाण राहणार नाही असे ठरवा. त्याच्याशी संबंधित व्यक्तींना क्षमा करा. मग दुसऱ्या दिवशी दुसरा प्रसंग आठवा. स्वतःचे आयुष्य अक्षरशः खणून काढा.
नदीचे पाणी स्वच्छ होण्यासाठी, तिचा प्रवाह खळाळता राहण्यासाठी, नदीतला गाळ मधूनमधून काढावा लागतो. आपला जीवनप्रवाह तुंबून राहू नये, खळाळता राहावा अशी तुमची इच्छा असेल तर ही शल्ये, राग, दुःख उपटून फेकून दिली पाहिजेत.
विसरणे आणि क्षमा करणे हे अवघड आहे हे तर खरेच; पण प्रयत्न करून पाहा. यथावकाश क्षमाशीलतेतून मिळणाऱ्या शांतीचा तुम्हाला प्रत्यय येईल. मनाचे शुद्धीकरण झाले की मग स्वच्छ, निर्मळ झालेल्या आपल्या मनात अतीव शांती भरून येते. त्यातून एक वेगळीच प्रसन्नता मनाला लाभते.
आजच्या परिस्थितीत तर राग, रुसवा, द्वेष अशा गोष्टींना थाराच नाही. कारण करोनामुळे सर्व एकमेकांपासून दूर अंतरावर राहत आहेत. मात्र, हे अंतर फक्त शारीरिक असावे, मनातून कुणालाही अंतर देऊ नये. आज खरी गरज आहे एकमेकांना सांभाळून घेण्याची. करोनाबाधित रुग्ण बरे झाल्यावर घरी आल्यानंतर शेजाऱ्यापाजाऱ्यांनी त्यांच्याशी आपुलकीने वागणे गरजेचे आहे.