सिमला – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांनी रविवारी सुखविंदर सिंग सुखू यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारने अतिवृष्टीत सापडलेल्या राज्यातील नागरीकांच्या मदतीसाठी केलेल्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. आणीबाणीच्या या काळात सरकार-विरोधकांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
ते म्हणाले की, सरकार आपत्तीचा चांगल्या पद्धतीने सामना करत आहे. सरकारने विरोधकांकडून सहकार्य घेतले पाहिजे आणि संपूर्ण विरोधकांनीही सरकारला मदत केली पाहिजे. ज्या पद्धतीने हजारो पर्यटकांना कठीण भागातून बाहेर काढण्यात आले त्याबद्दल मी सरकारचे अभिनंदन करतो. संपूर्ण राज्य या आपत्तीशी एकजुटीने लढताना मला पहायचे आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान हिमाचल प्रदेशात मान्सूनचा प्रकोप कायम आहे, त्यामुळे भूस्खलन आणि अचानक पूर येत आहेत. त्या मालिकेत शनिवारी बिलासपूर जिल्ह्यात नवीन भूस्खलनाची नोंद झाली. 24 जूनपासून पावसाळा सुरू झाल्यापासून राज्यात पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे मृतांचा आकडा 223 वर पोहोचला आहे.
हिमाचल प्रदेशात आतापर्यंत 223 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 295 जण जखमी झाले आहेत. तब्बल 800 घरांचेही पूर्णपणे नुकसान झाले आहे, तर आणखी 7500 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे, असे हिमाचलचे महसूल मंत्री जगतसिंग नेगी यांनी शनिवारी सांगितले.