मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपाकडून वारंवार होणाऱ्या टीकेवर अखेर मौन सोडले आहे. “महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत असून त्याच्यावर कोणीही प्रश्न उपस्थित केले नाहीत. भाजपाला माझ्यापासून भीती वाटत असल्यानेच वैयक्तिक हल्ला करत,” असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या संपूर्ण वर्षात आदित्य ठाकरे हे विरोधकांच्या निशाणावरच होते. याच संबंधी प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे यांनी, “त्याच्याकडे दुर्लक्ष करणं जास्त योग्य असल्याचा मी विचार केला. कामावर संपूर्ण लक्ष असल्याने तिकडे लक्ष गेलं नाही. महाविकास आघाडी चांगलं काम करत असून कोणीही त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाहीत ही आमच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. यामुळे चुकीचे आरोप आणि वैयक्तिक हल्ले झाले. पण पाच वर्ष आम्ही काम करु, राजकारण नाही”,असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.
“जिथपर्यंत माझ्यावर वैयक्तिक हल्ला होण्याची गोष्ट आहे. तुम्ही फुटबॉल पाहिले असेल तिथे मेस्सी किंवा रोनाल्डो यांच्यासाठी मॅन टू मॅन मार्किंग केली जाते. त्यांनी गोल करु नये यासाठी घेरण्यात आलेले असते. कदातिच त्यांना माझ्यापासून भीती वाटत असेल,” असे आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितले.
आदित्य ठाकरे यांना यावेळी बॉलिवूडपासून ते मुंबई पोलिसांपर्यंत झालेले वाद तसेच त्यात नाव आल्यासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “जोपर्यंत आपलं सरकार होतं तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित होतं असं विरोधकांना वाटत आहे. विमान भरुन दिल्लीला कार्यक्रमात जात असत. त्यांच्यासाठी गाणी गात होते. त्यांच्याशी चांगले संबंधही होते. पण जेव्हापासून सरकार गेलं तेव्हापासून त्यांना ते वाईट वाटू लागले आहेत. बॉलिवूड, मुंबईचे लोक वाईट वाटू लागले. मुंबईला ड्रग्ज सेंटर म्हणण्यात आलं. सरकार बदलल्याने त्यांच्या चश्म्याचा नंबरही बदलला असावा. त्याच्या पोटात दुखत आहे. मुंबई, महाराष्ट्रात होणाऱ्या चांगल्या गोष्टींमुळे वाईट वाटत असून आरोप करत सुटले आहेत”.