नवी दिल्ली – अरविंद केजरीवाल नावाच्या उच्चविद्या विभूषित व्यक्तीने अगोदर तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात रान पेटवले. दिल्लीत त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या करप्शन विरोधी आंदोलनात असंख्य तरूण स्वयंप्रेरणेने सहभागी झाले.
आंदोलनाच्या वातावरण निर्मितीमुळेच यूपीए सरकारला दहा वर्षांची सत्ता गमवावी लागली हे वास्तव. त्या एका आंदोलनातूनच केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचा उदय झाला आणि त्या आंदोलनाचीच परिणती की अनेक नेतेही दिल्लीत आणि देशाच्या निवडक भागात उदयाला आले. केजरीवाल यांच्या पक्षाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही प्राप्त केला.
मात्र आता हे सगळे डळमळीत भासते आहे. कारण केजरीवाल आता अडचणीत असल्यामुळे पक्ष संघटनेला एकमुखी नेतृत्व नसल्याचे गेल्या दोन दिवसांत प्रकर्षाने समोर येते आहे. केजरीवाल जनाधार असलेले नेते आहेत. कोणाच्या पुण्याईमुळे अथवा घराणेशाहीमुळे त्यांना जनाधार प्राप्त झाला नाही.
तो त्यांनी स्वत:च्या कष्टाने, लोकांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या प्रामाणिक बोलण्याने आणि उक्ती आणि कृतीत अंतर नसल्याचे सिध्द करून दाखवल्यामुळे मिळवला आहे. मध्यम वर्गातील, उच्च पदावर नोकरीला असलेले किंबहुना विदेशात बड्या पॅकेजच्या नोकरीला असलेले अनेक तरूण केजरीवाल यांच्या मोहीमेशी आणि पक्षाशी जोडले गेले.
एकांडे शिलेदार म्हणून समाजात काम करणारे, पत्रकार, सरकारी नोकर अशा सगळ्यांनाच केजरीवाल यांच्यात आशेचा एक किरण दिसला आणि आपच्या भ्रष्टाचार विरोधी मोहीमेत ते सगळे सहभागी झाले आणि दिल्लीत तीन वेळा आपचे सरकारही आले. पंजाबमधील जनतेनेही वेगळी वाट चोखाळत ओळख नसलेल्या चेहऱ्यांकडे धुरा सोपवत आपवर विश्वास व्यक्त केला. गुजरात, हरियाणा, गोवा आदी राज्यांत आपने आपली उपस्थिती नोंदवली.
तथापि, गेल्या दोन अडीच वर्षांत पक्षाला ग्रहण लागल्यासारखी स्थिती आहे. अगोदर केजरीवाल यांच्याशी मतभेद झाल्यामुळे आंदोलनातील काही बड्या चेहऱ्यांनी आप पासून फारकत घेतली. यातले काही अन्य पक्षाला जाऊन मिळाले तर काही जण पुन्हा स्वबळावर समाजात राजकीय शाल न पांघरता काम करत आहेत. मात्र मनिष सिसोदिया हे केजरीवाल यांच्यासोबतच राहीले.
त्यांच्याकडे पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून पाहिले जात होते. अगोदर सिसोदिया यांना अटक झाली आणि आता स्वत: केजरीवाल यांना. त्यामुळे पक्षाकडे कोणी नायकच नाही अशी अवस्था अद्याप निर्माण झाली नसली तरी केजरीवाल आणि सिसोदिया यांच्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेली पोकळी जाणवणारी होती. केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीत निदर्शने नक्कीच झाली, मात्र त्यात केजरीवाल टच नव्हता हेही खरेच.
राजकीय पाश्र्वभूमी नसलेला आपचा सर्वसामान्य कार्यकर्ता विवंचनेत आहे. गेल्या दशकात संघटनेच्या माध्यमातून जी पेरणी करण्यात आली होती त्याचे चीज होताना दिसत असतानाच एक अनिश्चितता अचानक समोर उभी आहे. दिल्ली आपचे सत्ताकेंद्र आहे. त्यालाच हादरा बसला आहे. त्याची हानी न होता अन्यत्रही पक्षसंघटनेचा पाया राखून ठेवण्याचे आव्हान विस्ताराचे स्वप्न पाहणाऱ्या आपला अगोदर पेलावे लागणार आहे.