डेहराडून – समाजामध्ये आजही आम्हाला हीन वागणूक मिळते. मात्र आम्हाला सर्वांकडून माणुसकीची वागणूक हवी आहे; कारण आम्हालाही आत्मसन्मान आहे. त्यामुळे आगामी लोकसभेत जो पक्ष अथवा उमेदवार ट्रान्सजेंडर्सच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याचे आश्वासन दे ईल, त्यालाच आमचा समाज मतदान करेल, असे प्रतिपादन ट्रान्सजेंडर (किन्नर) आखाडा परिषदेचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी केले आहे.
सर्वसामान्य मतदाराप्रमाणेच कोणतेही सरकार बनवण्यात ट्रान्सजेंडर समाजाचे मतही महत्त्वाची भूमिका बजावते, याकडे लक्ष वेधून त्रिपाठी म्हणाले की, म्हणूनच आम्ही निवडणूक आयोगापासून ते राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींपर्यंत प्रत्येक वर्ग, धर्म, जात आणि वयाच्या मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करत आहोत. एका तरी राजकीय पक्षाने त्यांच्या ववचनपत्रात आम्हा समाजाचा विचार करावा, अशी अपेक्षाही लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी व्यक्त केली.
देशभर किमान ४८ हजार पात्र ट्रान्सजेंडर्स मतदार असून त्यांना कोणीही गृहित धरु नये, असे सांगून त्रिपाठी म्हणाले की, ट्रान्सजेंडर ही देखील माणसेच आहेत. ते सामाजिक भेदभावामुळे उपेक्षित आहेत. त्यांना दररोज अपमानाला सामोरे जावे लागते. बदलत्या काळानुसार काही लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.
विशेषत: २०२१ मध्ये हरिद्वार कुंभमेळ्यात, किन्नर आखाड्याच्या शाहीस्नान आणि इतिहसात पेशवाईच्या कालखंडात लोकांनी ट्रान्सजेंडरना जवळून पाहिले आणि समजून घेतले. यामुळे ट्रान्सजेंडर्सबद्दल लोकांमध्ये असलेले गैरसमज कमी झाले आहेत. तरिही बहुतेक लोकांची विचारसरणी अजून बदललेली नाही.
त्रिपाठी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने ट्रान्सजेंडरना तृतीय लिंग म्हणून मान्यता दिली आहे. अनेक ओनलाईन व्यवहारात आता तिसरे लिंग म्हणून ट्रान्सजेंडर असा उल्लेख करता येतो. म्हणूनच लोकशाहीत सर्वसामान्य मतदाराप्रमाणे आम्हालाही मतदानाचा अधिकार आहे.
देशातील ट्रान्सजेंडर सजग नागरिकांची भूमिका बजावतात आणि स्वतः मतदानासाठी जातात. शासनाच्या नजरेत ट्रान्सजेंडर उपेक्षित आहेत. सरकारने ट्रान्सजेंडरना काही अधिकार दिले असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. म्हणून आता राजकीय पक्षांनी या निवडणुकीच्या वेळी तरी आमच्या समाजाकडे लक्ष द्यावे. आयोगाच्या मतदार यादीपेक्षा ट्रान्सजेंडरची खरी संख्या जास्त आहे.
जनजागृतीअभावी काही ट्रान्सजेंडरना मतदार यादीत नाव नोंदवता येत नाही. आयोग ट्रान्सजेंडरना मतदार ओळखपत्र बनवण्याबाबत जागरूकताही घडवून आणत नाही, तर मोठ्या संख्येने ट्रान्सजेंडरची नोंदणी स्त्री-पुरुष म्हणून चुकीची केली जाते.
किन्नर बचाओ-किन्नर पढाओ
बेटी बचाओ-बेटी पढाओप्रमाणेच सरकारने किन्नर बचाओ-किन्नर पढाओ जनजागृती मोहीम राबवण्याची गरज आहे. ट्रान्सजेंडर मुलांनाही शिक्षण घ्यायचे आहे, पण त्यांच्यासाठी आश्वासक वातावरण नाही. शाळांमध्ये शिक्षकांपासून इतर विद्यार्थ्यांपर्यंत भेदभावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे ट्रान्सजेंडर मुले शाळा सोडतात. निरक्षरतेमुळे ते समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेले आहेत.
ट्रान्सजेंडर मुलांसाठी स्वतंत्र योजना बनवण्याची गरज आहे. अनेक ट्रान्सजेंडर सुशिक्षित आहेत. कॉर्पोरेट जगताने त्यांच्यासाठी नोकऱ्यांचे दरवाजे उघडले आहेत. अनेक शहरांमध्ये ट्रान्सजेंडर नोकरी करत आहेत आणि सर्वसामान्यांप्रमाणे जगत आहेत. आता सरकारनेही प्रत्येक विभागात ट्रान्सजेंडरसाठी रोजगाराची दारे खुली करावीत. त्यांच्यासाठी अल्पसंख्याक कोट्याचे आरक्षण लागू करावे.