नाणे मावळ – मावळ तालुक्यात रस्त्यालगत, माळरान, डोंगर-टेकड्यांवर फुललेल्या केशरी फुलांचा बहर मनाला सुखावह वाटत असला तरी तो पर्यावरणाच्या दृष्टिने घातक ठरू पाहत आहे. फोफावणारी “कॉसमॉस सल्फ्यूरीयर्स’ ही वनस्पती पर्यावरणासाठी घातक ठरत असल्याचे कृषीतज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले. कॉसमॉस या परदेशी तणामुळे स्थानिक गवत हळूहळू नष्ट होत असल्याचेही कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे.
त्यामुळे या वनस्पती फैलावाचा वेग असाच वाढत राहिल्यास जनावरांचे खाद्य कमी होईल. हे सौंदर्य पर्यावरणासाठी घातक ठरत असल्याने काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत कॉसमॉस वनस्पती हटविण्यासाठी मोठ्या प्रमाणात चळवळ उभी केल्याचे दिसून आले आहे.
परदेशी तण “कॉसमॉस’ यावर प्राणी, पक्ष्यांना उपजिविका करता येत नाही.
या तणामुळे जनावरांना आवश्यक असणारे स्थानिक गवत नष्ट करून स्वत: मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केवळ फुले चांगली दिसतात. पर्यटक अथवा स्थानिकांना त्याचा उपयोग किंवा अन्य माहिती नाही. सध्या शेताच्या बांधावर देखील ते येत आहे. परिणामी जैवसाखळी नष्ट होत आहे. मेंढरे, गाय, बैल, शेळ्या यांसाठी जे गवत लागते, ते कमी होत असल्याने त्यांना अन्यत्र फिरावे लागत आहे.
या “कॉसमॉस’बाबत शेतकरी, नागरिक यांच्यात जनजागृती करायला हवी. हे तण काढून टाकण्यासाठी चळवळ उभी राहिली पाहिजे, अशी माहिती येथील स्थानिक नागरिक देत आहेत. सध्या वृक्षारोपणाची चळवळ आहे, तशी तण काढण्याची सुरू व्हावी. समूळ उच्चाटन करण्यासाठी गावांमधील जैवविविधता समित्यांना, नागरिकांना याबाबत सांगायला हवे. लोकसहभाग घेतला तरच हे तण नष्ट होईल.
मधमाशांच्या मधावर संशोधनपूर्वी या कॉसमॉस फुलांवर किटक बसत नव्हते. पण अन्य काहीच पर्याय नसल्याने “इप्सिफोरिया’ ही मधमाशांची स्थानिक जात त्यावर आता बसू लागली आहे. त्यातील परागकण घेऊन ते मध तयार करीत आहेत. ते मध खाल्ले तर त्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होईल, त्याबाबत संशोधन करणे आवश्यक आहे. एकूणच हे “कॉसमॉस’ तण नुकसानकारक आहे.
“काढा तण, वाचवा वन’
कॉसमॉस नावाची ही वनस्पती (तण) परदेशी असून, पर्यावरणासाठी घातक मानली जाते. ही वनस्पती मॉक्सिकोमधून भारतात आली. हे तण भारतीय वनस्पतींनी वाढू देत नाही. स्वत:चे अस्तित्त्व दाखविते. त्यामुळे भारतीय गवत नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कॉसमॉस या तणाची वाढ निश्चित थांबविण्याची गरज आहे. यासाठी अनेक समाजसेवी संस्थांकडून पुढाकार घेत कॉसमॉस उच्चाटनाची “जैविक आक्रमण विरोधी चळवळ’ उभारली जात आहे. या चळवळीतून “काढा तण, वाचवा वन’ ही चळवळ जोर धरू लागली आहे.