आ. मुरकुटेंना मतविभाजणाची धास्ती
नेवासे – काळ बदलला की अनेक वेळा राजकारणाचे सारिपाठही बदलतात आणि बदलत्या राजकारणात दीर्घकाळ सत्ता भोगलेल्या राज्यकर्त्यांनाही आपल्या अस्तित्वासाठी लढाई करावी लागते. तशी काहीशी अवस्था जिल्ह्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची झाली आहे. आपले अस्तित्व टिकविण्यासाठी या दोन्ही पक्षाला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. सन 2014 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीशी फारकत घेतलेल्या माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची व अस्तित्वाची ठरली आहे. तालुक्यात हजारो कोटींची कामे केली असली तरी कामांच्या दर्जाबाबत प्रश्न चिन्ह उभे राहत असल्याने तसेच राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्यामुळे होणारे मतविभाजन यामुळे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे धास्तावले आहेत.
देशाच्या राजकारणात कॉंग्रेसचे नेते कै. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रचा मंगलकलश दिल्लीवरून मुंबईत आणला. तेव्हापासून कॉंग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी यांच्या ताब्यातच राज्याची चावी दीर्घकाळ राहिली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी कॉंग्रेस व राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले. सत्ता गमवावी लागली. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभव पत्करावा लागला. त्यात नेवासे मतदारासंघात गडाखांना पराभव झाला. हा पराभव गडाखांच्या चांगलाच जिव्हारी लागला.
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून नव्याने पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्याच्या नव्हे तर राज्यात राजकारणात गडाखांना मोठे महत्व होते. सन 2014 निवडणुकीत पक्षाचे नेते चंद्रशेखर घुले यांनी विरोधकांना मदत केल्याचा ठपका ठेवून शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादी सोडून स्वतंत्र क्रांतिकारी शेतकरी पक्ष उभा केल्या. या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढविली. त्यात त्यांना चांगले यश मिळाले. सात जिल्हा परिषद गटापैकी पाच गट गडाखांच्या ताब्यात आले. तेव्हापासून त्यांनी या पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता.
मध्यतंरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश आले नाही. विधानसभेचे वारे वाहू लागल्यानंतर गडाखांनी अन्य पक्षांची देखील चाचपणी केली. भाजप असे शिवसेना या दोन्ही पक्षांची चाचपणी केल्यानंतर गडाखांनी अखेर आपण स्थापन केलेल्या पक्षामार्फत निवडणूक लढण्याची भूमिका जाहीर केली. सन 2014 मध्ये झालेल्या पराभवानंतर गडाखांना तालुका पिंजून काढला. वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. परंतु अजूनही लोकांमधील नाराजी दूर करण्यात यांना यश आलेले नाही. प्रचाराची रणनिती काळानुरूप बदली आहे. पण गडाख सध्या आपल्या जुन्याच प्रचाराच्या पद्धतीवर लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. अर्थात गडाखांचाही एकास एक लढ होण्याऐवजी तिरंगी किंवा चौरंगी लढचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने ते रणनिती आखत आहे. परंतु ही रणनिती हाणूण पाडण्याचा प्रयत्न आ. मुरकुटे यांच्याकडून होत आहे.
राष्ट्रवादीचे संभाव्या उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्यामुळे आ. मुरकुटेंची अडचण होणार आहे. मतविभाजन टाळण्यासाठी लंघे रिंगणात उतरणार नाही. हा प्रयत्न होत आहे. अर्थात लंघे यांचे भाजपचे जुने नाते आहे. त्या नात्याची पुन्हा जुळवा जुळव करून त्यांच्या पदरात शनिशिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थानचे अध्यक्षपद देवून त्यांना आपसे करण्याचा डाव भाजपकडून टाकला जात आहे. त्यामुळे गडाख विरूद्ध आ. मुरकुटे अशी सरळ लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक गडाखांसाठी अस्तित्वाची ठरणार आहे.