मुंबई – “सरकारी यंत्रणांचा गैरवापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी करावा ही काही लोकशाही नाही. केंद्र सरकारने पत्रकारांवरील कारवाईचे समर्थन केले. तसे असेल तर भाजपने आणीबाणीचा निषेध करणे सोडले पाहिजे. तपास यंत्रणा स्वायत्त आणि स्वतंत्र असून आपले कायदेशीर कर्तव्य बजावीत आहेत, असे केंद्रीय प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर म्हणतात.
तपास यंत्रणा स्वायत्त की सरकारच्या गुलाम हे संपूर्ण देश जाणतोय,’ अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्या गटाने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर आपल्या मुखपत्रातून टीका केली आहे.
“ईडी’सारख्या तपास यंत्रणांना सर्वोच्च न्यायालयाने “निष्पक्ष रहा, सूडाने कारवाया करू नका,’ असे बजावले आहे यातच सर्व आले. पत्रकारांवरील धाडी व कारवाया हे यंत्रणा निष्पक्ष असल्याचे लक्षण नसून सरकार घाबरले असल्याची टिकाही ठाकरे गटाने मुखपत्रातून केली आहे.
पंतप्रधान मोदी व त्यांच्या भाजपविरुद्ध बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांवर मंगळवारी दिल्ली येथे धाडी पडल्या. “न्यूज क्लिक’ या वृत्त संकेतस्थळाचे संस्थापक संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना तर अटक केली गेली.
चीनधार्जिणा दुष्प्रचार चालविण्यासाठी बेकायदा आर्थिक मदत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर असून “यूएपीए’ म्हणजे बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंगळवारी मध्यरात्री 2 वाजल्यापासून या धाडी सुरू झाल्या.
दहशतवाद्यांच्या अड्डयात घुसून “कोम्बिंग’ ऑपरेशन करावे तशा पद्धतीने पोलिसांची पथके पत्रकारांच्या घरात घुसली. लेखिका गीता हरिहरन, अभिसार शर्मा, भाषा सिंह, उर्मिलेश, अनिंदो चक्रवर्ती, इतिहासकार सोहेल हाशमी,
व्यंगचित्रकार संजय राजौरा, इरफान खान, स्तंभलेखिका अनुराधा रमन, सत्यम तिवारी अशा अनेक पत्रकारांवर छापे टाकून त्यांचे फोन, लॅपटॉप आदी साहित्य जप्त केले.
कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांच्या घरीही पोलीस पोहोचले. येचुरी यांचे स्वीय सहाय्यक नारायणन यांचे चिरंजीव सुमित “न्यूज क्लिक’मध्ये कामाला आहेत. त्यामुळे येचुरी यांच्या घरावर छापे पडले, असेही ठाकरे गटाने पुढे म्हणले आहे.
पाक विषयाची हवा गेली म्हणून आता चीन
भारतात घुसलेल्या चीनला हात लावता येत नाही व पत्रकारांवर धाडी घालून सरकार भलतीच “सिंघमगिरी’ दाखवू पाहत आहे. “देशात विरोधकांच्या पाठीशी एक शक्ती असून त्यांना देशात अराजकता माजवायची आहे.
त्यासाठी त्यांना चीनमधून अर्थपुरवठा होत आहे,’ असा फडणवीस यांचा आरोप गंभीर आहे. पाकिस्तान विषयाची हवा संपल्याने आता चीनच्या टायरमध्ये हवा भरण्याचे काम भाजपकडून सुरू आहे, असेही ठाकरे गटाने पुढे म्हटले आहे.