नवी दिल्ली – आपल्याला केवळ दहशतवादच नाही तर दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या व्यवस्थेलाही उद्वस्त करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय तपास संस्था अर्थात “एनआयए’ने आयोजित केलेल्या दोन दिवसीय दहशतवाद विरोधी परिषदेचे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते.
एनआयएच्या देखरेखीखाली देशात दहशतवादविरोधी आदर्श संरचना तयार केली जावी, अशी सूचना गृहमंत्र्यांनी केली. विविध दहशतवादविरोधी यंत्रणांची श्रेणी, संरचना आणि तपासाची पद्धत सर्व राज्यांमध्ये समान असली पाहिजे, जेणेकरून केंद्र आणि राज्य संस्थांमध्ये अधिक चांगला समन्वय साधता येईल. कोणतीही नवी दहशतवादी संघटना तयार होऊच नये यासाठी सर्व दहशतवादविरोधी यंत्रणांना असा कठोर दृष्टिकोन स्वीकारावा लागेल, असेही ते पुढे म्हणाले.
एनआयए, एटीएस आणि एसटीएफ या यंत्रणांचे काम केवळ तपास करणे हे नाही, तर तपासाच्या मर्यादेतून बाहेर पडत, वेगळ्या पद्धतीने दहशतवादावर प्रहार करण्याच्या दिशेने त्यांनी काम करायला हवे. दहशतवादाविरुद्धच्या या लढ्यात, जागतिक पातळीपासून ते गावापर्यंत आणि देशातल्या विविध राज्यांपासून ते आंतरराष्ट्रीय सहकार्य घेऊन काम करण्याची गरज आहे, असे शहा म्हणाले.
क्रिप्टो, हवाला, दहशतवादाला आर्थिक पाठबळ , संघटित गुन्हेगारी सिंडिकेट, अंमली पदार्थ तस्करी-दहशतवाद यांच्यातील साटेलोटे, यासारख्या सर्व आव्हानांवर केंद्र सरकारने जी कठोर भूमिका घेतली आहे, ज्याचे चांगले परिणाम मिळाले आहेत, असे गृहमंत्री म्हणाले.
2001 मध्ये दहशतवादी घटनांची संख्या 6000 होती. केंद्र सरकारच्या कठोर भूमिकेमुळे ही संख्या 2022 मध्ये 900 पर्यंत कमी झाली आहे. 94 टक्क्यांहून अधिक दोषसिद्धी दर साध्य केल्याबद्दल, त्यांनी एनआयएची प्रशंसा केली.